खासगी विद्यापीठांच्या उभारणीत डॉ पतंगराव कदम यांचे मोठे योगदान – डॉ शां.ब.मुजुमदार
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा २६ वा स्थापना दिन साजरा
पुणे – शिक्षणातून ग्रामीण भागाचा चेहरा बदलणाऱ्या डॉ पतंगराव कदम यांच्या जीवनाचा शिक्षण, राजकारण आणि समाजकारण असा समभुज त्रिकोण होता. महाराष्ट्रात खासगी महाविद्यालये होती पण खासगी विद्यापीठे नव्हती. ती उभारण्यात डॉ पतंगराव कदम यांचे मोठे योगदान आहे असे मत सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ अभिमत विश् वविद्यालयाचा २६ वा स्थापना दिन समारंभ करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन साजरा करण्यात आला त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवक यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह, विश्व विद्यालयाचे प्र कुलगुरू व राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालक डॉ अस्मिता जगताप, सहकार्यवाह व.भा. म्हेत्रे, डॉ. के.डी. जाधव, डॉ. एम. एस. सगरे, कुलसचिव जी. जयकुमार यावेळी उपस्थित होते.
डॉ. मुजुमदार म्हणाले करोनामुळे विद्यार्थी नसलेले विद्यापीठाचे ओसाड परिसर पाहणे क्लेशदायक वाटतें. बागा आहेत पण फुले नाहीत अशी अवस्था झाली आहे.विध्वंसक करोनाने माणसांना स्वतः विषयी अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडले आहे. अशाश्वततेची जाणीव करून देताना साधेपणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे . ऑस्कफर्ड, केंब्रिज आणि हार्वर्ड या जुन्या विद्यापीठांनी मानवी इतिहासातील भयानक महासाथी पाहिल्या. तरीही ती विद्यापीठे कॅम्पस विद्यापीठे म्हणूनच आजही कार्यरत आहेत. करोनाची लाट संपल्यानंतर सर्व काही पूर्ववत होईल अशी आशा आहे. करोनाच्या संकट काळात भारती हॉस्पिटलने जे रुग्ण सेवेचे काम केले ते कौतुकास्पद आहे.
डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले करो नाच्या या संकटात संशोधनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. प्रयोगशाळेतील संशोधनाचा समाजासाठी उपयोग होणे गरजेचे असून संशोधनात माणसांचे प्राण वाचविण्याचे सामर्थ्य असले पाहिजे अशा संशोधनात भारती विद्यापीठ अग्रेसर आहे. नवे शिक्षण धोरण शिक्षककेंद्री आहे याचे भान शिक्षकांनी ठेवले पाहिजे. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले भारती विद्यापीठ स्थापनेपासूनच डॉ पतंगराव कदम यांच्या मार्गद्शनाखाली कायम ध्येयवादाने कार्यरत राहिलेले आहे. शिक्षण क्षेत्रात प्रगतीची झेप घेताना भारती विद्यापीठाने नेहमीच सामाजिक बांधिलकीला सर्वोच्च प्राधान्य दिले. करोनाने वर्क फ्रॉम होम बरोबरच लर्न फ्रॉम होम ही संकल्पना शिक्षणक्षेत्राला दिली. करोनामुळे शिक्षण क्षेत्रासमोर निर्माण झालेल्या आव्हानांचा सर्वांनी विचारपूर्वक सामना केला पाहिजे. डॉ साळुंखे यांनी भारती विश्वविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल सादर करताना नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमल बजावणीसाठी भारती विद्यापीठ सज्ज आहे असे सांगितले. विचार भारतीचे संपादक प्रा. मिलिंद जोशी यांनी स्वागत केले. जी. जयकुमार यांनी आभार मानले.
