शेतक-यांचे उत्तरदायित्व सरकारने स्विकारायला हवे- सदाभाऊ खोत
पुणे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलित बांधवांचे उद्धारकर्ते नव्हते, तर संपूर्ण मानवजातीला सन्मानाने जगता येईल, असे काम त्यांनी केले. शेतीची मालकी ही जो त्याकरीता घाम गाळत आहे, त्याच्याकडे असायला हवी. कष्ट शेतक-यांनी करायचे आणि सावकाराने त्यांना लुटायचे, हे चालणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र, आज शासनाला महसूल देणारा, पोटभर खायला देणारा, देशाचा पोशिंदा असलेल्या शेतक-याकडे आपले लक्ष नाही. त्यामुळे शेतक-यांचे उत्तरदायित्व सरकारने स्विकारायला हवे, असे मत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पहिली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आॅनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये सदाभाऊ खोत हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रामीण धोरण याविषयावर बोलत होते. लायन्स क्लब इंटरनॅशनल व लायन्स क्लब आॅफ ग्लोबल टिचर्स यांच्या सहकार्याने ही व्याख्यानमाला होत आहे. जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या यू टयूब पेजवरुन ही व्याख्याने प्रसारित होत आहेत. \
सदाभाऊ खोत म्हणाले, शेतक-यांना पायाभूत सुविधा सरकारने द्यायला हव्या. नवे तंत्रज्ञान, बि-बियाणे, पाण्याचे नियोजन असायला हवे. कोरडवाहू शेतीला बागायत करायला हवे, असा विचार करणारे डॉ.आंबेडकर हे भारतीय अस्मितेचे प्रतिक होते. आजच्या काळात आपण शेतक-यांना सर्वतोपरी मदत केली पाहिजे. पण आम्ही त्यादिशेने काम करत नाही. ग्रामीण भागात पारंपरिक उद्योग ग्रामीण भागात राहिलेले नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आरक्षण निती याविषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. अनिल लोखंडे यांनी विचार मांडले. ते म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा खडतर प्रवास थक्क करणारा आहे. घटनेच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना आरक्षण मिळाल्याने त्यांची उन्नती होत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात आरक्षणाविषयी वेगळा प्रवास आहे. मात्र, आज बहुतांश लोक आरक्षणाचा फायदा घेऊन स्वत:ची प्रगती करीत आहेत.
इन्स्टिटयूटचे उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश देणा-या समाजसुधारकांपैकी महत्वाचे व्यक्तिमत्व असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व्हावा, याउद्देशाने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर यांनी आभार मानले.
