वस्तूंवर एमआरपीप्रमाणे उत्पादन मूल्य छापण्याचे बंधन हवे- सूर्यकांत पाठक
पुणे : सध्या बाजारात एमआरपी या तीन अक्षरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, त्यांना त्याचे काहीच वाटत नाही. परंतु सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडत आहे. उत्पादकाने त्याच्या उत्पादनावर किती किंमत छापावी याचे कोणतेही मार्गदर्शक तत्त्व सरकारने बनवले नाही. त्यामुळे बहुतांश उत्पादनावर मनमानी किमती छापून ग्राहकांना अक्षरश: लुटले जात आहे. त्यामुळे वस्तूंवर एमआरपी प्रमाणे उत्पादन मूल्य छापण्याचे बंधन असावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत पाठक यांनी केली आहे.
जागतिक ग्राहक दिन (दि. १५ मार्च) सर्वत्र साजरा केला जातो. आपल्या देशात ग्राहक संरक्षण कायदा सन १९८६ साली अस्तित्वात आला. त्याही अगोदर ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सन १९७६ साली एमआरपी कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार उत्पादकांना त्यांच्या उत्पादनावर किंमत छापणे बंधनकारक केले गेले. परंतु मनमानी किमती छापून ग्राहकांना लुटले जात आहे.
सूर्यकांत पाठक म्हणाले, एमआरपी म्हणजे मॅक्सिमम रिटेल प्राईज. कोणत्याही वस्तूवर ती छापलेली असते. वस्तूची छापील किंमत पाहून ग्राहकांना काहीच बोलता येत नाही. ग्राहकांना हे माहिती आहे की, ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार वस्तूची किंमत, वजन, दर्जा, उपयोगिता आदीची माहिती घेण्याचा त्याला कायदेशीर अधिकार आहे. मग किंमत एवढी कशी? या प्रश्नाचे उत्तर त्याला कोण देणार. एमआरपीमुळे ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी सर्व उत्पादनांवर एमआरपी, वजन त्याच प्रमाणे उत्पादनमूल्य प्रकाशित करणे बंधनकारक असावे. त्यासोबतच कोणत्याही उत्पादनाचे लहान व मोठ्या पॅकच्या वजन व किमतीमध्ये योग्य ते गुणोत्तर असावे. म्हणजेच लहान पॅकच्या तुलनेत मोठा पॅक महाग नसावा. आणि जीएसटी नंबर धारण केलेल्या सर्व रजिस्टर्ड व्यापाºयांना सर्व उत्पादकाकडून एकदराने माल मिळावा. तरच ग्राहक दिन ख-या अर्थाने साजरा होईल, असेही त्यांनी सांगितले.
