Saturday, June 13, 2026
MAHARASHTRATOP NEWS

सीडीआर मिळवल्या बद्दल माझी चौकशी करा – देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ९ – मनसुख हिरेन प्रकरणात फक्त खूनीच शोधणार नाही, तर त्यापलीकडीलही माहिती मिळवेन, माझा अधिकार आहे तो. मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी करा असे सांगत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज मंगळवारी विधानसभेत आक्रमक झाले. नाना पटोले मला धमकी देतात, मी घाबरत नाही असे सांगत त्यांनी आपली चौकशी करण्याचे आव्हान सत्ताधाऱ्यांना दिले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मंगळवारी मनसुख हिरेन प्रकरणाच्या निमित्ताने सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्यातील संभाषणाचा सीडीआर देवेंद्र फडणवीस यांना मिळालाच कसा ? असा सवाल केला होता. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओत सापडलेले जिलेटीन ही स्फोटके नव्हती ही माहिती फडणवीस यांना मिळाली कशी ? हा सगळा प्लॅन कोणी केला असाही सवाल नाना पटोले यांनी केला. त्यावर मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी करा असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले. आधी ज्यांनी खून केला त्यांची चौकशी करा असेही फडणवीस म्हणाले. सीडीआर प्रकरणावर विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली. आधी निलंबित करा आणि मग बडतर्फ करा असेही फडणवीस यावेळी म्हणाले. सचिन वाझे यांना आमच्या सरकारच्या कालावधीत नियुक्ती आम्ही नाकारली होती. पण ठाकरे सरकाने केवळ एका समितीच्या आधारावर त्यांना पुन्हा सेवेत घेतले. ख्वाजा युनिसच्या आईची याचिका न्यायालयात असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. त्यावेळी ख्वाजा युनिसच्या आईची याचिका कोर्टाने दाखल करून घेतली नसल्याचे फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. हे कोणत्या पक्षाचे आहेत ? त्यांना इतके पाठीशी का घातले जात आहे ? असाही सवाल फडणवीस यांनी केला.

मनसुख हिरेन प्रकरणात सरकारने स्वतंत्र अशी चौकशी दहशतवाद विरोधी पथकाकडे दिलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणताही पक्षपात केला जाणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. मनसुख हिरेन प्रकरणाचा एटीएसकडून तपास सुरू आहे. त्यांचा मृत्यू होणे दुर्दैवी आहे. राज्य सरकार या प्रकरणात प्रोफेशनली चौकशी करेल. विरोधी पक्षनेत्यांकडे या प्रकरणात काही कागदपत्रे असतील तर ती माझ्याकडे किंवा एटीएसकडे द्यावी असेही ते म्हणाले. दादरा नगर हवेलीचे खासदार यांना महाराष्ट्र सरकारवर विश्वास होता. म्हणूनच त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर विश्वास दाखवला. मोहन डेलकर प्रकरणात एसआयटी चौकशी होईल असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading