महिलांची केवळ गृहिणी म्हणून ओळख नसावी – चंद्रकांत पाटील
पुणे, दि. २४ – आपल्या १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात महिलांचे प्रमाण मोठे आहे. त्यांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. तरीही काही उच्च शिक्षित महिला आपली ओळख करुन देताना गृहिणी असेच सांगतात. त्यामुळे महिलांची केवळ गृहिणी म्हणून ओळख नसावी, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. कोथरुड भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते.
याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, वासंती जाधव, हर्षाली माथवड, छाया मारणे, श्रद्धा प्रभुणे, अल्पना वर्पे, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, मिताली सावळेकर,नगरसेवक जयंत भावे बाळासाहेब टेमकर, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीपजी खर्डेकर, पुणे शहर चिटणीस अनिता तलाठी, शहर चिटणीस प्रशांत हरसुले, महिला मोर्चा पुणे शहर सरचिटणीस कांचन कुंबरे, उपाध्यक्ष गौरी करंजकर, चिटणीस विनिता काळे, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, सरचिटणीस अनुराधा येडके, ओबीसी आघाडी अध्यक्ष रमेश चव्हाण, भाजयुमो शहर चिटणीस अपर्णा लोणारे, भाजयुमो कोथरुड चिटणीस अभिजीत राऊत, भाजपा प्रभाग १३ अध्यक्ष राजेंद्र येडे, सरचिटणीस प्राची बगाटे, बाळासाहेब धनवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कोथरुड मतदारसंघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पाटील म्हणाले की, आपल्या देशातील महिला उच्च शिक्षित आणि कर्तुत्ववान आहेत. काहीजणी अनेकदा सार्वजनिक ठिकाणी आपली ओळख करुन देताना गृहिणी असेच सांगतात. उच्च शिक्षित असूनही त्यांनी आपली ओळख गृहिणी करुन देणे हे योग्य नाही. त्यांनी ही आपली वेगळी ओळख निर्माण करावी. आपल्या शिक्षणाचा उपयोग करून, त्यांनी ज्ञानदानाचे काम करावे. तर ज्यांना ज्या क्षेत्रात रुची आहे, त्यांनी त्या क्षेत्रात आपले योगदान देऊन, आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.ते पुढे म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात एका ठराविक काळानंतर महिलांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यातच कुटुंबाच्या आर्थिक परिस्थिती मुळे त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी महिला मोर्चाच्या वतीने वेळोवेळी वस्ती भागातील महिलांची आरोग्य तपासणी शिबिर घेऊन, त्यांना आवश्यक ते औषधोपचार उपलब्ध करून दिले पाहिजेत. अशी सूचना त्यांनी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कोथरूड महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे यांनी महिला सक्षमीकरण व्हावे यासाठी सर्वांनी कार्य करावे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी सुरु केलेल्या योजना तळागाळातल्या महिलां पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले तर केतकी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन व जयश्री तलेसरा यांनी आभार प्रदर्शन केले.
