Saturday, May 30, 2026
PUNE

ज्ञानलालसा आणि जिज्ञासू वृत्ती क्षीण होत आहे – प्रा. मिलींद जोशी

पुणेः- जागतिकीरणाच्या नादात आपण देशी अस्सलता विसरत चाललो आहोत. जगात काय घडत आहे, याची खबरबात ठेवतांना आपल्याला आपल्या परिसरात असेलेली झाडे-वेलींची नावे देखील माहित नाहीत. ज्ञानलालसा आणि जिज्ञासू वृत्ती क्षीण होत आहे. हे समाजाच्या बाैद्धिक अधोगतीचे लक्षण असल्याचे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि प्रसिद्ध लेखक प्रा. मिलींद जोशी यांनी व्यक्त केले.

साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि प्रा. विश्र्वास वसेकर लिखीत ‘ऋतु बरवा’ या पर्यावरण विषयक ललित ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन प्रा. मिलींद जोशी बोलत होते. यावेळी साधनाचे संपादक आणि साधना प्रकाशनाचे विनोद शिरसााठ, उद्धव कानडे, प्राचार्य डाॅ. संभाजी मलघे, कवी संतोष पवार, गिरीश सहस्त्रबुद्धे, जे.पी.देसाई, प्रज्ञा करडखेडकर, श्रावणी वैद्य, सुरेश पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा.मिलींद जोशी म्हणाले की,ललीत बंधांच्या उगमस्थानी डाॅ. इरावती कर्वे आहेत. त्यांनी ललीत बंधाला नवीन आकृती बंध दिला. ईरावती कर्वे आणि कुसुमावती देशपांडे यांच्या नंतर ललित लेखनाला आलेले साचलेपण दुर्गाबाईंनी आपल्या व्यसंगी वृत्तीने आणि अनोख्या शैलीने दूर केले. उत्तम ललित लेखनासाठी व्यासंग, सुक्ष्म निरिक्षण शक्ती, चित्रदर्शी भाषा आणि अनुभवांशी एकरुप होण्याची वृत्ती असा संगम होणे आवश्यक असते. आज आपण बाैद्धिक प्रगतीच्या नादात निसर्गाकडे दुर्लक्ष करीत आहोत. गेल्या काही वर्षात ऋतुमानात अचानक बदल झालेले आहेत. माणूस आणि निसर्ग यांचे जवळचे नाते आहे. माणसाची जीवनशैली त्यांची खाद्य आणि वस्त्र संस्कृती आणि सगळ्या गोष्टी ऋतुंशी निगडीत असतात. त्यामुळे जी मानवी संस्कृती विकसीत होते तीच मुळात ऋतुंनुसार होते. हे लक्षात घेऊन आपले ऋतु आणि त्याकाळात घडणारे निसर्गदर्शन जाणून घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.

ज्येष्ठ रंगकर्मी सतिश आळेकर म्हणाले की, निसर्ग मनुष्य प्राण्याच्या रोजच्या जगण्यातील भाग झाला पाहिजे. येणा-या पिढीला निसर्गाचे बाळकडू दिल्यास भविष्यात निर्सगसेवक तयार होतील. निसर्गाप्रती संवेदनशिलता न दाखविल्यास किंवा त्यास गृहीत धरल्यास तो मनुष्य जातीचा समुळ नाश करु शकेल. निरर्गाच्या ताकदीपुढे मनुष्यप्राणी क्षुल्लक आहे.

एम्प्रेस गार्डनचे मानद संचालक सुरेश पिंगळे म्हणाले की, पुण्याचे वैभव आणि मोठा एेतिहासिक वारसा असलेले एम्प्रेस गार्डनचे अस्तित्व मोठ्या संकटात आले आहे. राजकीय नेत्यांची वक्र दृष्टी या मोठ्या जमिनीवर पडलेली असून तिथे सनदी अधिका-यांसाठी बंगले बांधण्याचे कारस्थान रचले जात आहे. सर्व निरर्गप्रेमी आणि पर्यावरण प्रेमिंनी एकत्र येऊन या विरुद्ध जनआंदोलन उभारण्याची आवश्यकता आहे.

लेखक प्रा.विश्वास वसेकर यांनी झाडे आणि पर्यावरण यांचे नाते स्पष्ट केले. साधनाचे संपादक आणि प्रकाशक विनोद शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading