नाशिक येथे होणार 94 वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन
औरंगाबाद – ९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजन स्थळावर आज अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले असून त्यावर नाशिकची मोहोर उमटली आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील औरंगाबाद येथे यासंदर्भात घोषणा केली. आगामी मार्च महिन्यात हे संमेलन घेण्यात येणार असून लवकरच त्याची तारीख घोषित करण्यात येणार असल्याचे ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, मंडळाच्या या निर्णयाचे नाशिकच्या साहित्य विश्वाकडून स्वागत करण्यात येत आहे.
महामंडळाच्या प्रतिनिधी मंडळाने गुरूवारी संमेलन स्थळाच्या यादीत असलेल्या नाशिकला भेट देऊन आवश्यक ती पाहणी केली होती. तयासंदर्भातील अहवाल महामंडळाला दिल्यानंतर आज संमेलन स्थळाची औपचारिक घोषणा करण्यात आली. याप्रस्तावित संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलू, पुणे (दिल्लीसाठी) आणि अमळनेर येथील प्रत्येकी एक अशी एकूण पाच निमंत्रणे आली होते. साहित्य महामंडळाने स्थळ निवडीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्विकारले.
दरम्यान, ९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान नाशिकला मिळाल्याचा मनस्वी आनंद झाल्याची प्रतिक्रिया लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगांवकर यांनी दिली. यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचे हिरक महोत्सवी वर्ष आणि नाशिक जिल्हा निर्मितीला १५१ वर्षे पूर्ण झाल्याचा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. संमेलनासाठीचे निमंत्रण जरी लोकहितवादी मंडळातर्फे देण्यात आले असले तरी हे संमेलन तमाम जिल्हावासिय आणि साहित्य जगताचे राहणार आहे. त्याच्या व्यापक यशासाठी सर्वांचा हिरीरीने सहभाग राहणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षभरात कोणताही सोहळा न पाहिलेल्या नाशिककरांना साहित्य संमेलनाची मेजवानी मिळणार आहेयानिमित्त सामुहिक प्रयत्नांतून नाशिकचे नाव उज्ज्वल करण्याची संधी आपल्याला लाभणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
