नवीन वर्षातही स्वयंशिस्त पाळा; कोरोनाला दूर ठेवा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई – महाराष्ट्रातील सण आता संपले आहेत. मात्र, आता नवीन वर्ष येऊ घातले आहे. येत्या वर्षांत सर्वांना सुदृढ दिर्घायुष्य लाभू देत असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षांत सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ते आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते.
नवीन वर्षांचे स्वागत करताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे. युरोपातील काही देशांत नवीन वर्षांच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र, तशी वेळ आपल्यावर येऊ नये याकरता सावधानता बाळगणं गरजेचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
काही तज्ज्ञांनी १ जानेवारीपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, महाराष्ट्रात अशी वेळ येईल असं वाटत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू होणार नाही याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. तसंच, पुढचे किमान सहा महिने तरी मास्क बंधनकाराक राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
अनलॉकच्या काळात विकासकामांना गती
अनलॉकच्या काळात विकासकामांना गती देण्यात आली आहे. या विकासकामांची मी स्वत: पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. समृद्धी महामार्गाचे काम कुठवर आले आहे, हे पाहण्यासाठी मी स्वत: औरंगाबादचा दौरा केला. येत्या १ मे रोजी नागपूर ते शिर्डी असा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच, लॉकडाऊनच्या काळात सिंधुदुर्ग विमानतळाचे काम रखडले होते. मात्र, हे विमानतळही जानेवारीमहिन्यापर्यंत खुले करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही ते म्हणाले.
