संबंध ठेवल्यानंतर मुलीच बलात्काराची तक्रार करतात, महिला आयोगाच्या अध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य
रायपूर, दि. 13 – महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे देशभरात चिंतेचं वातावरण आहे. तर दुसरीकडे छत्तीसगड राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी धक्कादायक विधान केले आहे. ‘बऱ्याच मुली या स्वत: हून संबंध ठेवतात आणि ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकरावर बलात्काराचा आरोप करतात’, असं संतापजनक वक्तव्य अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे.
किरणमयी नायक या छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. जेव्हा एक विवाहित व्यक्ती एखाद्या तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत असेल तर अशावेळी मुलींनी ती व्यक्ती आपल्याला जगण्यासाठी मदत करणार आहे की नाही. पण, जेव्हा या व्यक्तीने विवाहबाह्य संबंध ठेवल्यानंतर नाते हे दुरावतात तेव्हा तरुणीही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी धाव घेते, असंही किरणमयी नायक म्हणाल्या. असं वृत्त दैनिक लोकसत्ताने दिले आहे.
एवढंच नाहीतर किरणमयी नायक यांनी मुलींना सल्लाही दिला आहे. ‘अल्पवयीन मुलींनी कोणत्याही सिनेमातील फिल्मी रोमान्सच्या जाळ्यात फसू नये, त्यामुळे तुमचं कुटुंब, मित्र आणि तुमचं आयुष्य यामुळे उद्ध्वस्त होऊन जाईल. हल्ली वयाच्या 18 व्या वर्षीच लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे. लवकर लग्न झाल्यानंतर लवकर मुलंही होतात. त्यामुळे त्यांना एकत्र राहण्यास अडचण येते’ असंही त्या म्हणाल्या.
“ज्या काही घटना समोर येत आहे, त्यामध्ये लिव्ह इनमध्ये राहिल्यामुळे असे प्रकार समोर आले आहे. लिव्ह इनमध्ये राहून सहमतीने संबंध ठेवले जातात आणि त्यानंतर मुलगी ही बलात्काराची तक्रार करते. त्यामुळे मुलींनी पाहिले नातं समजून घेतले पाहिजे. तुम्ही जर अशा नातेसंबधांमध्ये असाल तर त्याचे परिणाम हे वाईटच होणार आहे” असा सल्लाही किरणमयी नायक यांनी मुलींना दिला. नायक यांच्या या विधानामुळे छत्तीसगडमध्ये खळबळ उडाली आहे.
