शरद पवारांनी अखेर ‘त्या’ पत्रावर सोडलं मौन
मुंबई, दि. 8 – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर राजधानी दिल्लीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या भेटीदरम्यान राजनाथ सिंह आणि शरद पवार यांच्या पुरंदर विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाविषयी चर्चा झाली, असल्याचे त्यांनी सांगितले. यासह युपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषीमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत असताना शरद पवारांनी कृषी कायद्यातील सुधारणांसंदर्भात अनेक राज्यांना पत्र लिहिले होते. यासंदर्भात देखील शरद पवारांनी भाष्य केले आहे. दरम्यान सध्या देशभरात शेतकरी आंदोलन सुरू असताना त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा हे पत्र व्हायरल झाले आहे. तर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी या पत्रांचा उल्लेख करत पवारांवर चांगलाच निशाणा देखील साधला होता.
यावेळी पत्रकारांनी भाजप नेत्यांनी २०१० चे तुमचे पत्र दाखवून आरोप केला आहे, असे विचारले असताना पवार म्हणाले की, ‘मी पत्र लिहिले होते ते खरं आहे. पण, माझ्या पत्राचा जी लोकं उल्लेख करीत आहे. त्यांनी माझे पत्र नीट वाचावे. मी माझ्या पत्रात एपीएमसी मार्केटबद्दल सुधारणा केली पाहिजे, असं बोललो आहे. पण आज मोदी सरकारने जे कृषी कायदे केले आहे. त्यामध्ये एपीएमसी मार्केटचा उल्लेखच नाही. त्यामुळे आमचे नाव घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे’.
यावेळी शरद पवारांना त्या पत्राबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले, “ज्यांनी पत्राचा हवाला दिला आहे त्यांनी ते थोडं नीट वाचलं असतं तर त्यांचा वेळ वाचला असता. कायद्यातील सुधारणांसंदर्भात पत्र लिहिलं होतं यामध्ये कोणतंही दुमत नाही. पण आज जे तीन नवे कृषी विधेयक आणले आहेत त्यात याचा उल्लेख दिसत नाही”.
