IPL 2020 -मुंबईचा दिल्लीवर दणदणीत विजय
दुबई, दि. 31 – आयपीएलच्या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट या वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ९ विकेट राखून मात केली. या सामन्यात आधी मुंबईने दिल्लीला केवळ ११० धावांवर रोखले आणि हे आव्हान अवघ्या १४.२ षटकांत गाठत हा सामना जिंकला. गतविजेत्या मुंबईने यंदाच्या मोसमात उत्कृष्ट खेळ केला असून १३ सामन्यांत हा त्यांचा नववा विजय होता. त्यामुळे मुंबईचे १८ गुण असून ते पहिल्या दोन स्थानांवर राहणार हेसुद्धा निश्चित झाले आहे.
दुबई येथे झालेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार किरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दिल्लीच्या डावाची खराब सुरुवात झाली. ट्रेंट बोल्टने दिल्लीचे सलामीवीर शिखर धवन (०) आणि पृथ्वी शॉ (१०) यांना झटपट माघारी पाठवले. यानंतर श्रेयस अय्यर (२५) आणि रिषभ पंत (२१) यांनी दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहुल चहरने अय्यरला बाद केले. तर बुमराहने पंत आणि स्टोईनिस (२) यांना एकाच षटकात माघारी पाठवत दिल्लीला आणखी अडचणीत टाकले. यानंतरच्या फलंदाजांनाही चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे दिल्लीला २० षटकांत ९ बाद ११० धावाच करता आल्या. मुंबईकडून बोल्ट आणि बुमराहने ३-३ विकेट घेतल्या.
मुंबईला १११ पेक्षा कमी धावांवर रोखणे दिल्लीच्या गोलंदाजांना अवघड जाणार हे अपेक्षित होते आणि तसेच झाले. मुंबईचे सलामीवीर ईशान किशन आणि क्विंटन डी कॉक यांनी सुरुवातीपासूनच दिल्लीच्या गोलंदाजांवर दबाव टाकला. या दोघांनी ६८ धावांची सलामी दिल्यावर डी कॉकला (२६) एन्रिच नॉर्खियाने बाद केले. किशनने मात्र आपली फटकेबाजी सुरु ठेवत ३७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यानंतर त्याने आणखी मोठे मारण्यास सुरुवात केली. त्याने ४७ चेंडूत नाबाद ७२ आणि सूर्यकुमार यादवने ११ चेंडूत नाबाद १२ धावांची खेळी करत मुंबईला विजय मिळवून दिला.