कलर्स वाहिनीचा मुख्यमंत्र्यांकडे माफीनामा
मुंबई, दि. 28 – कलर्स वाहिनीवरील सुप्रसिद्ध बिग बॉस कार्यक्रमात ‘मराठीची चीड येते’ असे संतापजनक वक्तव्य करणारा गायक जान कुमार सानू याच्या विरोधात अनेकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याच्यावर सोशल मीडियावरून प्रचंड टीका होत आहे. दरम्यान, या प्रकरणी कलर्स वाहिनीने आपला जाहीर माफीनामा सादर केला आहे. वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत माफी मागितली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
सध्या ‘बिग बॉस’चे 14वे पर्व मोठ्या जोशात सुरू आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडणे सुरू आहेत. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्यात घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत राहुल वैद्यचा हात धरला आहे. राहुलशी ती मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसत असते. याच दरम्यान तिने जानशीदेखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे म्हटले. त्याच्या या वक्तव्यानंतर त्याच्यावर प्रचंड टीका होत आहे.