छत्रपती शाहू महाराजांच्या इतिहासाचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा – संभाजीराजे छत्रपती
पुणे, दि. ६ – छत्रपती शिवाजी महाराज यांचा ४ थी च्या पाठ्यपुस्तकात धडा आहे. त्याप्रमाणेच राजर्षी शाहू महाराज यांचा इतिहासचा देखील शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा यासाठी त्वरीत पत्रव्यवहार सुरु करु. इयत्ता ४ थी च्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराज यांचा धडा आहे त्याचप्रमाणे मुलांना समजेल अशा ९ वी ते १२ वी पर्यंत च्या अभ्यासक्रमात देखील शिवाजी महाराज, शाहू महाराज, तारा राणी यांचा इतिहास सांगणारे धडे हवेत. असे मत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्यात योगदान दिलेल्या सरदारांच्या घराण्याचे वंशज यांची मराठा सरदार परिषद आॅनलाईन आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. ओंकार कोंढाळकर, अनिकेत कोंडे यांनी आॅनलाईन परिषदेचे आयोजन केले. भूषण राऊत, अतुल मारणे, भूषण पवार, ओंकार रणवरे, अमर तलवार, प्रज्वल कोंढरे, अभिषेक कोंढाळकर, दिपक खेमलपुरे यांचे सहकार्य लाभले.
युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले, स्वराज्य एका मराठ्याचे नव्हते. स्वराज्य सार्वभौम आहे. हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिले. अठरा पगड जात आणि बारा बलुतेदारांचे हे स्वराज्य आहे. हे त्यांनी सांगितले. कष्टाशिवाय यश मिळत नाही. लोकांमध्ये जाऊन काम करायला पाहिजे. आपल्या वंशजांचा इतिहास सांगायला पाहिजे. त्यांच्यासारखे काम करायला पाहिजे. समाज बदलू शकतो एवढी ताकद या मराठा घराण्यांमध्ये आहे.असे त्यांनी मराठा सरदारांच्या वंशजाना उद्ेशून सांगितले.
किल्यांचे संवर्धन आणि जतन करायला हवे. रायगड प्राधिकरण मॉडेल प्रमाणे इतर किल्यांचे संवर्धन व्हायला हवे. यासाठी काम सुरु आहे. फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून किल्ले आणि सरदारांचे जुने वाडे यांचे जतन करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. अनेक ठिकाणी मराठ्यांची वाईट परिस्थिती आहे. माझा लढा मराठा म्हणून नाही तर अठरा पगड जात आणि बारा बलुतेदारांना जोडण्यासाठी होता. प्रत्येक जात आणि धर्माचा आदर व्हायला हवा. असेही त्यांनी सांगितले.
तरुणांनी स्वत:च्या पायावर उभे राहा. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने सारथी संस्था उभी राहिली आहे. ती बंद पडण्यासाठी प्रयत्न झाले. परंतु आम्ही ते करु दिले नाहीत. गरिबातील गरीब मराठा समाज यातून उभा राहणार आहे. फेलशिप आणि स्कॉलरशीप सारथीच्या माध्यमातून मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ओंकार कोंढाळकर म्हणाले, मराठा साम्राज्यामध्ये ज्या घराण्यांनी योगदान दिले, त्या सर्व घराण्यातील तरुणांना एकत्र करणे आणि त्यांच्याकडून रचनात्मक सामाजिक कार्य करुन घेणे हा मराठा सरदार परिषदेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे मार्गदर्शन तरुणांना मिळणार आहे.