इतिहासापासून प्रेरणा घ्यायची आणि वर्तमानात कर्तृत्व करायचे असते
पुणे : इतिहासापासून प्रेरणा घेवून आज आपण काय केले पाहिजे, याचा विचार करायला हवा. महापुरूषांचा इतिहास माहिती असूनही काहीच न करता गप्प बसणे म्हणजे त्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे. इतिहासापासून प्रेरणा घ्यायची असते आणि वर्तमानात कर्तृत्व करायचे असते, असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
जनहित चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर परिसरात ‘आधुनिक हिंदवी स्वराज्यासाठी युवकांचे योगदान’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश ढमढेरे, उपाध्यक्ष निलेश खाणेकर, शिरीष मोहिते यांसह आमदार रविंद्र धंगेकर, मिलींद एकबोटे, रोहन जाधव, महेश सूर्यवंशी, बाळा शेडगे, ओजस साबडे, वसंत खुटवड, हेमंत तिरळे, अजित जाधवराव, पियुष शहा, संजय पासलकर, दिपक ढमढेरे आदी उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनमित्त रक्तदान शिबीर, मर्दानी साहसी प्रात्यक्षिके, गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, विद्यार्थ्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांचे सामुहिक चित्र रेखाटन, अंध- अपंग मुलांना स्नेह भोजन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले. रक्तदान शिबिरात २२५ जणांनी रक्तदान केले.
अविनाश धर्माधिकारी म्हणाले, आजचा भारत देश म्हणजे आपले हिंदवी स्वराज्य आहे. त्यावेळी देशासाठी तलवार उचलण्याची गरज होते. आज देशासाठी सैन्यात भरती तर आहेच त्याचबरोबर हातात लेखणी घेण्याची, बुद्धीचा वापर करण्याची गरज आहे. देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व टिकवून ठेवत आजच्या काळात देशाचा विकास करायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रकाश ढमढेरे म्हणाले, ट्रस्टच्या वतीन दरवर्षी श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम केले जातात. महाराजांचे कार्य आणि कर्तृत्व युवकांना कळावे व त्यांनी प्रेरणा घेवून समाजासाठी चांगले कार्य करावे हा उद्देश संस्थेचा असतो. हा उद्देश समोर ठेवून विविध कार्यक्रमांची आखणी केली जाते असेही त्यांनी सांगितले.
