लोकांना बदल हवा आहे; सर्वांनी एकत्र येण्याची गरज – शरद पवार
पुणे : कसब्यात यश मिळेल असं सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होतं. पण मला स्वत:ला खात्री नव्हती. नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ भाजपचा गड होता. कसब्यात बापट यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्त्व केलं होतं. गिरीश बापट यांचे भाजप आणि त्यांच्या परिवाराशी संबंध होते. पण, गैरभाजप लोकांशी मैत्री देखील त्यांची होती. यामुळं कसबा मतदारसंघ आपल्याला जड जाईल, असं वाटत होतं. बापट आणि टिळकांना डावलून निर्णय घेतल्याचा फटका भाजपला बसणार अशी चर्चा होती. भाजपच्या गडाला धंगेकरांनी सुरुंग लावला, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आज शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. यावेळी शरद पवार यांनी रवींद्र धंगेकर यांचं अभिनंदन केलं. पवार म्हणाले, रवींद्र धंगेकर यांची जुनी ओळख आहे असं नाही पण त्यांचा बारामतीशी संबंध आहे. हा उमदेवार चहासाठी पण बसत नाही. हा व्यक्ती दुचाकीवरुन फिरत होता. उमेदवार उत्तम, महाविकास आघाडीचं एकत्रित काम यामुळं हा निकाल लागला याचा आनंद आहे, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या लोकांना एकत्र ठेवणं आणि एकत्रित निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लोकांना बदल हवाय असं दिसतंय, असं शरद पवार म्हणाले.
संजय राऊत हे पत्रकार आहेत, त्यांचा लोकांचा अधिक अभ्यास असतो. मी महाराष्ट्रात फिरतोय लोकांना बदल हवाय. मी काल सातारा जिल्ह्यात होतो, नगर, नाशिकला होतो सगळीकडे फिरतोय लोकांना बदल हवाय, असं शरद पवार म्हणाले. या निवडणुकीत दोन गोष्टी झाल्या, महाविकास आघाडी एकजुटीनं काम करत होती. उमदेवाराबद्दल लोकांमध्ये चांगलं बोललं जात होतं. या दोन गोष्टींचा परिणाम कसब्याच्या निकालात दिसून आलं आहे. महाविकास आघाडीचं एकत्रित काम, उमदेवाराची मान्यता यामुळं यश मिळालं, असं शरद पवार म्हणाले.
महाविकास आघाडीचे नेते आहेत त्या सर्वांशी बोलणार आहे. काँग्रेस नेते, उद्धव ठाकरे यांच्याशी, डाव्या पक्षांशी आम्ही बोलणार आहे, असं शरद पवार म्हणाले. कसब्याच्या पोटनिवडणुकीत गेल्या काही वर्षांपासून एका पक्षाला मतदान करत होतो. पण पैशाचा वापर झाल्यानं त्यांनी वेगळा निकाल घेतल्याचं पारंपारिक मतदारांनी सांगितलं, असं शरद पवार म्हणाले. अरविंद केजरीवालच्या सरकारनं शाळा, शैक्षणिक संस्थामध्ये जे काम केलं ते पाहायला परदेशातून व्यक्ती येतात. ते काम ज्यांनी केलं त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे, असं शरद पवार म्हणाले.
काही लोक ज्यांच्यावर आरोप होते ते त्यांच्या पक्षात गेले की कारवाई थांबली. मला भाजपच्या एका नेत्यानं नाव विचारलं होतं. ठाण्यात कुणाला अटक करायचं ठरलं होतं त्याचं नाव सांगा, यवतमाळ वाशिम मध्ये कुणावर कारवाई होणार होती ती थांबली, असं शरद पवार म्हणाले. महाविकास आघाडीत जे पक्ष आहेत त्यांच्यात एकजूट आहे. जे महाविकास आघाडीत नाहीत त्यांच्याबद्दल बोलता येणार नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केले.