Wednesday, May 27, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कोळीवाड्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई  : कोळीवाडे हे मुंबईचे वैभव आहे. कोळी बांधवांची संस्कृती जपण्यासाठी, ती वाढविण्यासाठी तसेच अनेक वर्षे मुंबईत राहणाऱ्या कोळी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कोळीवाड्याचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

वरळी कोळीवाड्यातील मच्छिमार बांधवांसाठी १२० मीटरचा नेव्हीगेशन स्पॅन कायमस्वरूपी मिळवून दिल्याबद्दल वरळी कोळीवाडा येथे मच्छिमार बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मंत्री आशिष शेलार, विजय शिवतारे, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, कोळी बांधव हा दर्याचा राजा आहे. तो प्रेमळ, निडर  आणि संघर्ष करणाराही आहे. मी स्वतः माशांचा व्यवसाय केला असल्याने माझे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते आहे. मच्छिमारी करताना बोटींना अडचण निर्माण होईल यासाठी कोस्टल रोड प्रकल्पाच्या दोन खांबांमधील अंतर वाढविण्याची रास्त मागणी त्यांनी केली होती, त्यामुळे शासनाने ती मान्य करून दोन खांबांमधील अंतर १२० मीटर करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून कोळी समाज हा मुंबईचे मजबूत पिलर असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. याबरोबरच सिमांकन करणे, डिझेल परतावा आदी प्रश्न देखील सोडविण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

कोळीवाड्यांचा विकास व्हावा, रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी खाद्य महोत्सव आयोजित करणे, पर्यटनदृष्ट्या विकास करणे आदी निर्णय घेण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुंबई खड्डेमुक्त करणे, आरोग्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेट्रोचे जाळे उभारणे, कोस्टल रोड प्रकल्प आदी कामांना गती देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. नवी मुंबई विमानतळाला दी.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

मच्छिमार बांधवांचे जीवन सुकर व्हावे आणि कोळीवाड्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा हे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोळीवाड्यांच्या विकासाचा मास्टरप्लॅन तयार करण्यात आला असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले. कोळीवाड्यात फिरता येण्यासाठी पालकमंत्री म्हणून बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोळीवाड्यात धक्के (जेट्टी), मासे सुकविण्यासाठी जागा, घरांना आकर्षक रंग असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading