Thursday, May 14, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

4 च्या प्रभागामुळे महापालिका निवडणुकीची तयारी पुन्हा शून्यातून करावी लागणार

पुणे: महापालिकेच्या निवडणुकीसाठीची सर्व तयारी झाली, आता केवळ राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याचीच प्रतिक्षा होती. मात्र, राज्य सरकारने आज घेतलेल्या निर्णयामुळे पुण्यासह राज्यातील सर्व महापालिकेची प्रभाग रचना बदलणार आहे. प्रभाग रचनेपासून ते मतदार यादी तयार करणे, आरक्षणाची सोडत घेणे त्यासाठी हरकती सूचना घेणे यासाठी निवडणुकीची तयारी पुन्हा शून्यातून करावी लागणार आहे. या प्रक्रियेसाठी तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमक्या निवडणुका कधी होणार हा प्रश्‍न पुन्हा उपस्थित झाला आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक वेळेत न होऊ शकल्याने १४ मार्च २०२२ पासून प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त कामकाज पाहत आहेत. ही प्रशासकांची मुदत १५ सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यानुसार त्यापूर्वी महापालिका निवडणूक होऊन नवे नगरसेवक निवडून येणे आवश्‍यक आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही ओबीसी आरक्षणाचा निकाल देताना ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांची प्रक्रिया जेथे थांबली आहे, तेथून पुढे प्रक्रिया सुरू करा, दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करा असे सांगितले होते. त्यामुळे पुणे महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये होतील असा अंदाज वर्तविला जात होता. पण आजच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा निवडणूका कधी होणार असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

राज्य मंत्रिमंडळाने २०१७ प्रमाणे प्रभाग रचना असेल असे जाहीर केले तरी. याची अधिसूचना निघाल्यानंतर त्याबाबत निवडणूका आयोगाकडून पुन्हा प्रक्रिया राबविण्याचे आदेश महापालिकांना दिले जातील. कायद्यानुसार पुन्हा प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, त्यावर हरकती सूचना मागवून सुनावणी घेणे, सुनावणीचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठवणे त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल. तसेच त्याचसोबत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, महिला यांचे आरक्षण काढले जाईल.

तसेच चार सदस्यांचा प्रभाग झाल्यास प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी जाहीर करणे, त्यावर हरकती, सूचना नोदंविणे, त्या हरकतींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पडताळणी करणे, त्यात आवश्‍यक बदल करून अंतिम मतदार यादी जाहीर करणे ही प्रक्रिया पार पाडावी लागेल. यासाठी महापालिकेचे तीन ते चार हजार कर्मचाऱ्यांची गरज लागते. या सर्व प्रक्रियेसाठी किमान तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो.
सध्याच्या ५८ प्रभागांसाठी महापालिकेत ही सर्व प्रक्रिया गेल्या वर्षभरात पूर्ण झाली आहे. मात्र, आता ही प्रभाग रचना बदलल्यास त्याचे लेखी आदेश आल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने यासाठी प्रशासनाला तयार राहावे लागणार आहे. याबाबत उपायुक्त डॉ. यशवंत माने म्हणाले.अद्याप प्रभाग रचना व प्रक्रियेबाबत आम्हाला आयोगाकडून लेखी आदेश आलेले नाहीत. आदेश मिळाल्यानंतर त्याबाबत सांगितले जाईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading