माझी चूक झाली; ‘त्या’ वादग्रस्त विधानावर राज्यपालांचा माफीनामा
मुंबई : ‘माझ्याकडून कदाचित काही चूक झाली; मला क्षमा करा’, आशा शब्दात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समस्त मराठी माणसाची ‘त्या’ वादग्रस्त विधावर माफी मागितली आहे. आज एक निवेदन प्रसिद्ध करून त्यांनी आपला माफीनामा प्रसिद्ध केला आहे.
मुंबईमधून गुजराती आणि राजस्थानी माणसांना काढून ठाकले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, आशा आशयाचे विधान राज्यपालांनी केले होते. त्यावर सर्वस्तरातून टीका झाल्यानंतर आज राज्यपालांनी समस्त मराठी माणसाची माफी मागितली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लिहिले आहे की, ” दिनांक 29 जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.
गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.”