सुक्ष्मपुराजैवकी प्रस्तरविज्ञान विषयात नवीन तज्ज्ञ तयार होण्याची गरज – पी.आर .मिश्रा
पुणे: आजही आपल्याला नवीन खाणींचा शोध घेण्यासाठी पुरेसे तज्ज्ञ नसल्यामुळे तेलाच्या जुन्या खाणींवर काम करावे लागत आहे. कारण सुक्ष्मपुराजैवकी प्रस्तरविज्ञान या क्षेत्रात काम करणारे नवीन अभ्यासक तयार झालेले नाहीत. म्हणूनच नवीन खाणींचा शोध घेऊन त्यावर काम करणारी नविन तज्ज्ञ मंडळी तयार होणे गरजेचे असल्याचे मत जीजीएम व चीफ ऑपरेशनल जिओलॉजी, ओएनजीसी मुंबईचे पी.आर.मिश्रा यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ व्या ‘सुक्ष्मपुराजैवकी प्रस्तरविज्ञान’ परिषदेचे उद्घाटन झाले. या परिषदेच्या स्थापनेला नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या परिषदेचे यजमानपद दरवर्षी अनेक नामांकित संस्थांना मिळत असून यंदा हा मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला आहे.
या उद्घाटनप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, परिषदेचे अध्यक्ष आणि पेट्रोलियम भूवैज्ञानिक व सल्लागार डॉ.आनंद काळे, सीएसआयआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी, गोवा चे माजी उपसंचालक डॉ.राजीव निगम, लखनौ विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू आणि पॅलेओन्टोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रा.एम.पी. सिंग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश गोसावी, परिषदेच्या निमंत्रक रजनी पंचांग आदी यावेळी उपस्थित होते.
‘सुक्ष्मपुराजैवकी प्रस्तरविज्ञान’ या परिषदेत आजवर अनेक अभ्यासक सहभागी असून या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या, संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शोधनिबंध सादर करण्यासाठी ही परिषद उत्तम व्यासपीठ आहे. याच परिषदेत मी माझा पहिला शोधनिबंध सादर केला होता, असे मत सीएसआयआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी, गोवा चे माजी उपसंचालक डॉ.राजीव निगम यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रा. एम.पी.सिंग यांनी पॅलेओन्टोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया च्या कार्याविषयी माहिती दिली.
डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, ही परिषद चाळीस वर्षानंतर पुण्यात भरली असून याच्या आयोजनाचा मान विद्यापीठाला मिळाला ही अभिमानाची बाब आहे तर निमंत्रक डॉ. रजनी पंचांग यांनी १९९९ नंतर सुक्ष्मपुराजैवक या विषयात काम करणाऱ्या तज्ज्ञांची संख्या कमी झालेली असताना अशा परिषदेमुळे ही संख्या वाढेल असा विश्वास व्यक्त केला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही आंतरविद्याशाखीय शिक्षण देण्यास सुरुवात केली असून प्रशाला पद्धतीही सुरु केली आहे. यामागचा हेतू हाच की विद्यार्थ्यांमध्ये अंतरविद्याशाखीय दृष्टीकोन विकसित होऊन त्यातून अनेक नवे अभ्यासक तयार व्हावेत. विद्यापीठ स्टार्टअप विषयातही काम करत असून त्यातून नवकल्पना व नउद्योगांना चालना मिळेल. – डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
