आधी घोटाळा काय झाला आहे हे दाखवा मग आरोप करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली. ही कारवाई राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणावरून केली असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा मोठा धक्का मानला जातो. आधी घोटाळा काय झाला आहे हे दाखवून मग आरोप करा, अशा शब्दात अजित पवारांनी जरंडेश्वर कारखाना कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, कारखान्यावर ईडीने टाच आणली आहे ही बातमी खरी आहे. तपास यंत्रणांना चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. याआधीही चौकशी करण्यात आली, मात्र साध्य काहीच झालं नाही. चौकशी पारदर्शकपणे व्हावी. राज्य सहकारी बँकेत घोटाळा असता, तर नफ्यात आली नसती असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
त्यांनी जरंडेश्वर साखर कारखाना प्रक्रियेमध्ये सर्व कायदेशीर प्रक्रियेचं पालन झाल्याचा दावा केला. त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करताना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. कर्ज थकवणाऱ्या कारखान्यांची विक्री करण्याचा निर्णय उच्च न्यायालयानेच दिला होता. जरंडेश्वर कारखाना विकत घेण्यासाठी १५ एक कंपन्यांनी आपापले टेंडर भरले होते. गुरू कमोडिटी कंपनीने सर्वांत जास्त बोली लावली होती.
अजित पवार यांनी सांगितले की, पहिल्या वर्षात बीव्हीज कंपनीने कारखाना चालवायला घेतला. मात्र, कंपनीला मोठं नुकसान झालं. त्यानंतर माझ्या नातेवाईकांनी तो कारखाना चालवायला घेतला.
