Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRA

एमएमआर क्षेत्रातील प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करावेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई,- मुंबई शहरासह महानगर परिसराच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आढावा घेतला. हे प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करून नागरिकांना सुलभ आणि गतिमान परिवहन सेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन, महा मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे आणि मान्यवरांच्या हस्ते एमएमआर रिजनल प्लान या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. आजच्या बैठकीत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल), मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक मेट्रो प्रकल्पांच्या कामांची सद्यस्थिती, भविष्यातील नियोजन, निधीची उपलब्धता यासर्व बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

एमटीएचएल प्रकल्पाचे सुमारे ३५ ते ४० टक्के काम पूर्ण झाले असून सप्टेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सादरीकरणादरम्यान सांगण्यात आले. मुंबईतील सुमारे १४ मेट्रो लाईन्स प्रकल्पाद्वारे ३३७ कि.मी. मेट्रोचे जाळे निर्माण होणार आहे. मुंबईत मेट्रोची कामे अनेक ठिकाणी सुरू असून कामाच्या ठिकाणी पडणाऱ्या पावसाचे पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

एमयुटीपी ३ ए प्रकल्पांतर्गत उपनगरीय रेल्वे सेवांचा विस्तार, उपनगरीय स्थानकांचे आधुनिकीकरण आदी कामांचा समावेश असल्याचे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक  खुराणा यांनी सांगितले. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत यांनी पुणे, नागपूर आणि नाशिक मेट्रोबाबत सादरीकरण केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading