भारताची लसींची गरज दोन ते तीन महिन्यात पूर्ण होणं अशक्य – आदर पुनावाला
नवी दिल्ली- भारतीय नागरिकांच्या गरजांकडे दुर्लक्ष करून कधीही लस निर्यात केली नाही, असं स्पष्टीकरण सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी दिलं आहे. देशात कोरोना लसींचा तुटवडा असताना आदर पूनावाला यांनी इतर देशाना कोरोना लस निर्यात केली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यावर पूनावाला यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
देशात सुरूवातीला कोरोनाचा प्रादुर्भाव आता असलेल्या परिस्थितीच्या तुलनेत कमी होता. त्यामुळे कोरोना लस निर्यातीचा निर्णय घेण्यात आला होता. भारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्यामुळे इतक्या लोकांच्या लसींची गरज दोन ते तीन महिन्यात पूर्ण होणं अशक्य आहे. तर संपूर्ण जगाचं लसीकरण व्हायला दोन ते तीन वर्ष लागतील, अशी शक्यता आदर पूनावाला यांनी वर्तवली आहे.
”संकटकाळात आम्ही कोरोनाच्या लसी निर्यात केलेल्या नाहीत. आपण जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहोत, म्हणूनच इतक्या मोठ्या लोकसंख्येची लसीकरण मोहीम दोन ते तीन महिन्यांत पूर्ण करता येणार नाही कारण बरीच आव्हाने आहेत. संपूर्ण जगातील लोकसंख्येचं संपूर्ण लसीकरण होण्यासाठी साधारण दोन ते तीन वर्षे लागतील.”
यासह ते असेही म्हणाले की, ”कोरोनाच्या विक्रमी काळात सीरम इन्स्टिट्यूटने २० कोटी लसी दिल्या आहेत. संकटकाळात भारताना इतर देशाना मदत केली त्यामुळेच आता भारताला मदत करण्यासाठी इतर देश पुढे सरसावत आहेत. भारतात कोरोना लसींचा तुटवडा भासत असताना अशा संकट काळात आम्ही कोरोना लसी निर्यात केल्या नाहीत. तसेच लसीकरण मोहिमेला चालना मिळाली यासाठी शक्य असतील तितके प्रयत्न सीरम इन्स्टिट्यूट करेल. यासोबतच सरकारला माणुसकीतून शक्य आहे ती सर्व मदत करू”
