लोककलेचे चालते बोलते विद्यापीठ हरपले; भारुडरत्न निरंजन भाकरे यांना महाराष्ट्रातील लोककलावंतांच्या वतीने श्रद्धांजली
पुणे : भारुडरत्न निरंजन भाकरे यांनी लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. आपली कला महाराष्ट्रापुरती मर्यादीत न ठेवता अमेरिकेसारख्या देशापर्यंत जाऊन लोककला सादर केली. लोककलेला योग्य न्याय त्यांनी मिळवून दिला. निरंजन भाकरे हे लोककलेचे चालते बोलते विद्यापीठ होते. महाराष्ट्रातील पिढयानपिढ्या त्यांना भारुडासाठी लक्षात ठेवेल,अशा शब्दात महाराष्ट्रातील लोककलावंतांनी निरंजन भाकरे यांना श्रद्धांजली वाहिली.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या निरंजन भाकरे यांच्या आॅनलाईन श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहिर हेमंतराजे मावळे, ज्येष्ठ शाहिर अंबादास तावरे, बजरंग आंबी, देवानंद माळी, डॉ. राजू राऊत, शिवाजीराव पाटील, डॉ. सयाजीराव गायकवाड उपस्थित होते. यावेळी भाकरे यांच्यासोबतच्या विविध आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांचे लोककलेवरचे प्रेम, भारुडाच्या माध्यमातून केलेले समाजप्रबोधन, कलाकारांशी असेलेले ऋणानुबंध अशा आठवणी यावेळी कलावंतांनी सांगितल्या.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, शासनाच्या विविध योजनांचा प्रचार करण्यासाठी भाकरे यांनी आयुष्य वेचले. कोरोना संसर्गाच्या काळात देखील ते कोरोनाबाबत जनजागृतीमध्ये सहभागी झाले. कोरोनाच्या साथीने निधन झाल्यानंतर शासनाने त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
अंबादास तावरे म्हणाले, निरंजन भाकरे यांनी प्रबोधनात्मक भारुडाच्या माध्यमातून कलाक्षेत्रात एक उंची गाठली होती. नंदीबैल हे त्यांचे गाजलेले भारुड होते. लोककलेला त्यांनी योग्य न्याय दिला. त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. कलावंतांवर त्यांचे प्रेम होते. त्यांची उणीव नेहमीच भासेल. बजरंग आंबी म्हणाले, भारुडाला त्यांनी अत्युच्च पदावर नेऊन ठेवले. कोरोनाकाळात देखील त्यांनी कोरोनावर भारुड केले होते. त्यांच्या जाण्याने प्रबोधनाची ज्योत विझली आहे.