केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळं ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा तुटवडा – नाना पटोले
पुणे, दि. 24 – केवळ केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळं ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा काळाबाजार होत असल्याचा आरोप कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. तसंच पाकिस्तानला भारतानं लस फुकट दिली मग देशातील नागरिकांना का नाही, असा सवालही त्यांनी केला.
कोरोनाची एकूणच परिस्थिती आणि प्रामुख्यानं लसीच्या मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, अतुल लोंढे, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, शरद रणपिसे, मोहन जोशी, आबा बागुल, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, अभय छाजेड, अविनाश बागवे आदी उपस्थित होते.
कोरोनाची लस पुण्यात तयार होते, त्यामुळं पुण्यात पत्रकार परिषद घेत असल्याचं पटोले म्हणाले. केंद्र सरकारला लस 150 रुपयांना द्यायची आणि तीच राज्यांना 400 रुपयांना या मुद्द्यावर त्यांन आक्षेप घेतला. या मुद्द्यावर आंदोलन करणार होतो, पण कोरोनाच्या परिस्थितीमुळं आंदोलन टाळल्याचं पटोले म्हणाले. केंद्र सरकारनं फक्त दोनच कंपन्यांना लस निर्मितीची परवानगी दिली. त्यामुळं यामध्ये या कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. आता नागरिकांना लस पुरवणं ही केंद्राची जबाबदारी आहे, असंही पटोले म्हणाले. देशामध्ये लसीकरण हे केंद्र सरकारने मोफत करावे या मागणीसाठी पुण्याच्या विभागीय आयुक्तांना निवेदनही देण्यात आलं.
केंद्र सरकार एकिककडं भारताचा शत्रू अशी ओळख असलेल्या पाकिस्तानला मोफत लस देत आहे. मात्र देशातील नागरिकांना त्यासाठी पैसे मोजायला सांगत आहे. देशाला लस मोफत का देत नाही, असा प्रश्नही पटोली यांनी उपस्थित केला. पुनावाला हे कुणाचे मित्र आहेत, या भानगडीत मला पडायचे नाही. सरकारनं नागरिकांसाठी मोफत लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पटोले यांनी या पत्रकार परिषदेत केली. तसंच लसीच्या पुरवठ्यामध्ये निर्माण होणार तुटवडा यामागं नफेखोरीचा प्रकार अशल्याचा संशयदेखिल पटोले यांनी व्यक्त केला.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी मार्चच्या सुरुवातीलाच देशातून कोरोना गेला असं सांगितलं. मात्र देशात कोरोनाच्या मृत्यूचं तांडव सुरू आहे. दिल्लीत ऑक्सिजनअभावी तडफडून अनेकांनी प्राण गमावले आहेत, यासाठी कोण जबाबदार असा सवाल पटोले यांनी केला. केवळ केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळंच ऑक्सिजन आणि रमेडेसिविरचा तुटवडा असून, त्याचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला. कोरोनाची आकडेवारी महाराष्ट्रात आहे पण त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात आकडे लपवले जात नाहीत. त्यामुळंच राज्यात जास्त कोविड असल्याचं चित्र तयार केलं जात आहे. पण प्रत्यक्षात इतर ठिकाणी आकडे लपवले जात असून हळू हळू खरं चित्र समोर येत अस्लयाचंही पटोले म्हणाले.
राज्यातील लॉकडाऊन हा वेळोवेळी समोर येणाऱ्या परिस्थितीवर अवलंबून आहे. राज्याची स्थिती पाहून सध्याचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र 1 मेनंतर लॉक डाऊन पुढे सुरू ठेवायचा की इतर काही निर्णय घ्यायचा हे तेव्हाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल असंही पटोले यांनी म्हटलं. कोरोनाची स्थिती राज्यात आणि देशातही अत्यंत गंभीर वळणावर आहे, अशा वेळी अनिल देशमुख यांच्या कारवाईचा विषय हा केवळ लक्ष वळवण्याचा प्रयत्न असल्याचा थेट आरोपही पटोले यांनी केला आहे.
