‘मोदीमित्र’ या शब्दामुळे चंद्रकांत पाटील का तडकले? – रमेश बागवे
पुणे, दि. 23 – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी सिरम इन्स्टिट्यूचे आदर पुनावाला यांचा उल्लेख ‘मोदीमित्र’ असा केला त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा मस्तकशुळ उठायचे कारण काय? ‘मोदीमित्र’ असा एखाद्याचे उल्लेख करणे ही शिवी आहे काय? फक्त राहुल गांधीवर घाणेरडी टिका करून बातम्या छापून आणायच्या व त्या वरिष्ठांना दाखवून पक्षातील वरिष्ठांशी मर्जी राखून स्वत:चे पद टिकवायचे एवढेच काम कुवत नसलेला व जनाधार नसलेला स्थानिक पातळीवरील हा नेता करीत आहे. असा सणसणीत टोला काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पाटलांना लगावला आहे.
बागवे म्हणाले की, काँग्रेस नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गेल्या दोन महिन्यातील वर्तन त्यांनी तपासले असते तरी त्यांना राहुल गांधींबद्दल अधिक आदर वाटला असता. कोरोनावरील वॅक्सिन व रेमडेसिविर इंजेक्शन यांची निर्यात थांबवा ऑक्सिजन पुरवठा नियोजनबध्द होण्यात लक्ष घाला, परदेशी लस भारतात तयार होण्यासाठी परवानगी द्या असे मौलिक सल्ले राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना जाहिरपणे दिले आणि विशेष म्हणजे केंद्र सरकारने देखील ते मान्य केले तसेच पश्चिम बंगालमधील निवडणुकीत कोरोना विषाणुची लागण वाढेल यासाठी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस पक्षाच्या जाहिर सभा थांबविल्याचे त्यांनी जाहिर केले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा मात्र जमविलेल्या गर्दीसमोर भाषणे करीत स्टेजवर खुश होताना दिसत होते. पंतप्रधान पद हे केवळ मिरविण्याचे पद नाही तर कामाचे पद आहे. अशा वेळी पश्चिम बंगालमध्ये भाषणांपेक्षा देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी तातडीने लक्ष घालायला हवे होते आदरणीय राहुल गांधींचा आदर्श घ्यायला हवा होता. अखेरीस देशभर प्रचंड टिका झाल्यामुळे त्यांना बंगालचे दौरे थांबवावे लागले हे वास्तव आहे.
कोरोनावरील कोविडशिल्ड वॅक्सिनची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावाला यांनी केंद्र सरकारला १५० रू., राज्यसरकारला ४०० रू. व हॉस्पिटला ६०० रू. असे नवे दर जाहिर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संमतीविना असे दर जाहिर होऊ शकतात काय? जनता वैद्यकीय संकटात असताना अमाप फायदा मिळविणे कोणीच मान्य करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र ते मान्य करतात अशा वेळी सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांना मोदीमित्र असे संबोधने हे चंद्रकांत पाटील यांना इतके का डाचले बरे ! वास्तविक देशातील गरीब जनतेला आर्थिक संकटात टाकणाऱ्या वॅक्सिनच्या या दरवाढी विरूध्द महाराष्ट्रभर जनआंदोलने करण्याचा निर्णय चंद्रकांत पाटील यांनी घ्यायला पाहिजे होता. मात्र त्यांची तेवढी हिंमत होऊच शकत नाही. हे सारेजण ओळखतात त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची किव करावी असे वाढत आहे.
वॅक्सिन घेण्याची आवश्यकता असताना असहाय्य बनलेल्या गरीब जनतेला मोफत लस केंद्राने देणे हे प्रत्येक देशाप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची जबाबदारी आहे मात्र जसे अदानी, अबांनी धार्जीने व जनता विरोधी निर्णय मोदी सरकारने राबविले तसेच सिरम इन्स्टिट्यूच्या आदर पुनावाला या उद्योगपतींना प्रचंड नफा कमविण्यास मोकळिक दिली. या संकटकाळी भाजप नक्की कोणाबरोबर आहे हे जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे. दिवदमन मधील रेमडेसिविर इंजेक्शनचा साठ्या बाबत मुंबई पोलीसांनी कारवाई केली तेव्हा भाजपचे दोन्ही सभागृहातील नेते देवेंद्र फडणविस व प्रविण दरेकर यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धिंगाना घातला. साठेबाज, काळाबाजार करणारे यांची बाजू भाजप उघडपणे घेताना दिसत आहे हे त्यातून दिसून येते. चंद्रकांत पाटील यांना मात्र हे काही दिसत नाही. दिसत असले तरी कळत नाही हे सगळे समजण्याएवढी बुध्दी त्यांच्याकडे नसेल त्यामुळेच त्यांची किव येते. राहुल गांधींवर टिका करून त्या बातम्या पक्षातील वरिष्ठांना पाठवून त्यांना खुश करायचे व प्रदेशाध्यक्ष पद टिकवायचे यासाठी धडपडणाऱ्या या आमदारांना लवकरच उपरती होईल व जनतेच्या हिताचे निर्णय घ्या असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते सांगतील अशा बातम्यांचीच सारी जनता वाट बघत आहे.
जनतेशी नाळ तुटलेले स्थानिक नेते चंद्रकांत पाटील
कोणतेही राजकीय भवितव्य नसताना केवळ पुणे शहरातील सुरक्षित मतदार संघ निवडून पुण्यातून ते निवडून आले. ‘आयत्या बिळावर नागोबा’ असे त्यांना त्यावेळी संबोधले गेले. पुण्याचा उपयोग फक्त त्यांनी आमदार होण्यापुरता केला पुणे व महाराष्ट्र कोरोना संकटात ग्रासला गेला असताना महाराष्ट्र व पुण्याला ऑक्सिजन, रेमडेसिविर, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर मिळावेत म्हणून केंद्राकडे पाठपुरावा केला नाही. पुणेकरांशी काहीच भावनिक नाते नसणारे चंद्रकांत पाटील यांना पुणेकरांचा आक्रोश महाराष्ट्रातील जनतेचा आक्रोश दिसत नाही. त्यांना ‘चंपा’ म्हटल की राग येतो, आदर पुनावालांना ‘मोदीमित्र’ म्हटले की राग येतो आता जनतेला त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या भाजपा पक्षाबद्दल किती राग आला आहे हे त्यांना कधी कळणार बरे. असेही रमेश बागवे यांनी म्हटले आहे.