Saturday, May 30, 2026
PUNE

आधुनिक जीवनशैलीत उत्तम आरोग्याला महत्व महेंद्र चव्हाण यांचे मत

पुणे : “कोरोनाने आपल्याला अनेक गोष्टींचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. योग्य व्यायाम, समतोल आहार हा किती महत्वाचा आहे, हे गेल्या वर्षभरात आपण पाहिले आहे. कोरोनापासून बचाव करायचा असेल, तर आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धची ही लढाई जिंकण्यासाठी व्यायाम आणि पोषक आहाराला प्राधान्य द्यायला हवे,” असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. तज्ज्ञांनी उपस्थितांच्या अनेक आरोग्यविषयक समस्यांचे शंका निरसन केले.


सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सतर्फे सूर्यदत्ता हेल्थ बँक इनिशिएटिव्ह अंतर्गत जागतिक आरोग्य दिनानिमित्त सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ‘मिशन कोरोना इरॅडिकेशन’ मोहिमेतील पहिला कार्यक्रम ‘समृद्ध आयुष्याची गुरुकिल्ली’ या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजिले होते. प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जागतिक कीर्तीचे शरीरसौष्ठवपटू महेंद्र चव्हाण व प्रसिद्ध आहारतज्ज्ञ पौर्णिमा कारंडे उपस्थित होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाईन-ऑफलाईन स्वरूपात झाला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, संचालक प्रा. सुनील धाडीवाल आदी उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांना सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार, तर कारंडे यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.


मिशन कोरोना इरॅडीकेशन…
कोरोनाच्या समूळ निर्मूलनासाठी सुर्यदत्ता ग्रुपने ‘मिशन कोरोना इरॅडीकेशन’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत कोरोनविषयक नियमांचे पालन, वैद्यकीय माहितीच्या नोंदी, प्रतिकारशक्ती, आरोग्य व तंदुरुस्ती, पोषक आहार, नियमित आरोग्य तपासणी, समुपदेशन, पालकत्व, तणावमुक्ती, व्यसनमुक्ती, आर्थिक, भावनिक सक्षमीकरण, स्वयंपूर्ण बनवणे, आनंदी कुटुंब, ज्ञानाचे आदानप्रदान, सायबर सुरक्षा, इंटरनेटचा नैतिक वापर, सामाजिक जबाबदारी, राष्ट्रभक्ती, इतरांचा आदर, सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, सर्वांसाठी शिक्षण, सर्वांसाठी अन्न, वस्त्र, स्वच्छता, समानता या गोष्टींबाबत जागृती केली जाणार आहे. तसेच मर्यादित वापर, पुनर्वापर आणि पुनर्निर्माण यावर भर दिला जाणार आहे, असे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.
महेंद्र चव्हाण म्हणाले, “आजच्या आधुनिक जीवनशैलीत उत्तम आरोग्याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. सद्यस्थितीने अनेक गोष्टींचा अर्थ नव्याने समजून घेण्याची वेळ आणली आहे. आपण व्यायाम आणि आहाराचे महत्व समजून घेऊन कोरोना विरुद्धची ही लढाई जिंकायची आहे. स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम केला पाहिजे.”

पौर्णिमा कारंडे म्हणाल्या, “आहार हा सर्वात जास्त महत्वाचा घटक आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास तो पूरक असतो. सात्विक आहारावर लक्ष केंद्रित करावे. भरपूर पाणी प्यावे. प्रथिने, जीवनसत्वे यांचा रोजच्या आहारात समावेश करावा व समतोल आहार घ्यावा. थंड, आंबट पदार्थ, जंक फूड टाळावे.”

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “शरीर हे मंदिर आहे. त्याची नित्यनेमाने पूजा झाली पाहिजे. स्वस्थ शरीरातच निरोगी मन वास करते. आपली आंतरिक शक्ती विकसित करते. आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ही एक नाविन्यपूर्ण सुरवात आहे. कोरोनाचे समूळ उच्चाटन होण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जावेत.”

मार्गदर्शन सत्रानंतर महाविद्यालयाच्या योगशिक्षिका व झुंबा प्रशिक्षक सोनाली ससार यांनी शिक्षक व इतर कर्मचाऱ्यासांठी हेल्थ व फिटनेस ऍक्टिव्हिटीमध्ये पुशअप्स, ऐरोबिक्स, रेग्युलर वर्कआऊटशी संबंधित ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या. विजेत्यांना पदक प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यासाठी फेसबुक व यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपित करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading