आजही स्त्रियांच्या मनात निःशब्द भय आहे : डॉ. नीलिमा गुंडी
पुणे : आजचा समाज खूप पुढारलेला आहे असे म्हटले जाते पण सभोवती ज्या घटना घडताहेत त्यामुळे स्त्रियांच्या मनात निःशब्द भय आहे. असे मत ज्येष्ठ कवयित्री डॉ. नीलिमा गुंडी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित ‘कविता दुर्गेच्या’या ऑनलाईन कविसंमेलनाच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह प्रमोद आडकर, उद्धव कानडे, साहित्यदीप प्रतिष्ठानच्या ज्योत्स्ना चांदगुडे, धनंजय तडवळकर यावेळी उपस्थित होते. कविसंमेलनात डॉ. नीलिमा गुंडी, डॉ. अश्विनी धोंगडे, संजीवनी बोकील, अंजली कुलकर्णी, ज्योत्स्ना चांदगुडे, प्रभा सोनावणे, आश्लेषा महाजन, अनुजा जोशी(गोवा), नूतन शेटे(बेंगलोर), जान्हवी जोशी(सातारा), वैशाली मोहिते, कविता क्षीरसागर, चंचल काळे, मनीषा पाटील(सांगली), प्रतिभा जगदाळे(सांगली), रसिक देशमुख(औरंगाबाद) या कवयित्री सहभागी झाल्या होत्या.
गुंडी म्हणाल्या, समाजाला विचारांची कूस बदलायला लावणारे संवेदन कवितेतून प्रकट व्हायला हवे तरच परिवर्तन होईल. आज स्त्रियांच्या कवितेतील जाणिवांचा परिघ विस्तारतो आहे.
प्रा. जोशी म्हणाले, आज भूगर्भापासून अंतरिक्षापर्यन्त कर्तृत्वाची सर्व क्षेत्रे स्त्रियांनी काबीज केली आहेत तरीही मन विषण्ण करणाऱ्या घटना सभोवती घडतच आहेत. अजूनही व्यापक समाज शिक्षणाची गरज आहे. ज्योत्स्ना चांदगुडे यांनी प्रास्ताविक केले. वैशाली मोहिते यांनी कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले.