जलयुक्त शिवारची चौकशी करण्याचे आदेश
मुंबई, – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या गेलेल्या जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त करत राज्य सरकारने या योजनेबाबत एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याच मुद्द्यावरून सरकारवर पलटवार करत भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
‘संपूर्ण राज्यातील शेतकर्यांसाठी संजीवनी म्हणून ठरलेली जलयुक्त शिवार योजना ही जनचळवळ झाली. लोकवर्गणीच्या सहभागातून ही योजना गावागावात पोहचली. शेतकरी, कष्टकरी, श्रमिकांनी या योजनेत केलेले श्रम अपार आहेत. तुम्ही या श्रमिकांच्या श्रमाची चौकशी करणार काय?’ असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळात झाला याबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले की, हे राजकीय सूड बुध्दीने सुरू आहे. कुहेतू यामागे आहे. पण होऊ दे चौकशी… हातच्या कंगणाला आरसा कशाला. अहवाल आल्यावर आघाडी सरकार तोंडावर आपटेल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला आहे.