शैक्षणिक दान विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करेल – डॉ. अ.ल.देशमुख
पुणे : ग्रामीण विद्यार्थ्यांना सामाजिक चळवळ म्हणून समाजसेवकांनी मोठया प्रमाणात मदत करण्याची गरज आहे,तरच शहर व ग्रामीण मधील दरी कमी होईल. अन्यथा ग्रामीण विद्यार्थी शैक्षणिकदृष्टया मागे पडतील, याचा विचार आपल्याला करायला हवा. शैक्षणिक दान विद्यार्थ्यांच्या बौद्धिक जीवनात आनंद निर्माण करेल, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अ.ल.देशमुख यांनी व्यक्त केले.
समर्थ प्रतिष्ठान आणि सातपुते परिवार यांच्यावतीने शकुंतला सातपुते यांच्या सत्तरी आणि माजी नगरसेविका जोत्स्ना सरदेशपांडे एकाहत्तरी निमित्त १०० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, आयोजक संजय सातपुते, समर्थ प्रतिष्ठानचे पदाधिकारी सचिव सचिन होडगे,अथर्व कुलकर्णी, सुमित नितनवरे, सुरज डोंबे, वृद्धेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट, सुधीर दुर्गे उपस्थित होते. हिरामण बनकर विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना या वह्या देण्यात आल्या.
डॉ. अ.ल.देशमुख म्हणाले, शहरात राहणाºया विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सोयी उपलब्ध आहेत. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी आजही आवश्यक सुविधांपासून वंचित आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळायला हव्यात, यातून शिक्षण घेताना त्यांना अडचणी निर्माण होणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
संजय सातपुते म्हणाले, तरुणाई ही भारताची ताकद आहे. संस्थेच्यावतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवून तरुणांची शक्ती समाजसेवेकडे वळविण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. समाजकार्याची ही प्रेरणा आणि मार्गदर्शन मला आईकडून मिळाले आहे. तर गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काम करण्याची प्रेरणा माझ्या ज्ञानगुरू व मार्गदर्शक ज्योत्स्ना सरदेशपांडे यांच्याकडून मिळते.
