fbpx
Monday, May 13, 2024
MAHARASHTRA

#निसर्ग – रत्नागिरीला ७५ आणि सिंधुदुर्गला २५ कोटींची तातडीची मदत घोषित

नुकसान भरपाईचे निकष सुधारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई, दि ७ : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासियांच्या पाठीशी उभे राहील. तातडीची मदत म्हणून रत्नागिरीला ७५ कोटी रुपये व सिंधुदुर्गला २५ कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा आज मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह खासदार, आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी लोकप्रतिनिधींच्या सूचना ऐकल्या व प्रशासनाला योग्य निर्देश दिले.

ठाणे व पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे. मात्र, तेथील आढावा घेऊन मग निर्णय जाहीर केला जाईल. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना देण्यात आलेला निधी ही तातडीची मदत असून हे पॅकेज नसल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचे जुने निकष बदलण्याची गरज असून नवे सुधारित निकष कसे असावेत त्याबाबत प्रशासनाने लवकर माहिती सादर करावी. त्याआधारे योग्य निर्णय घेता येईल.

भूमिगत विद्युत तारांबाबत विचार

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, संकट किती गंभीर आहे यावर मी बोलणार नाही, कारण कोकणवासियांनी ते अनुभवले आहे. सरकार तुमच्या सोबत आहे. लवकरात लवकर मी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागालाही भेट देईन. या संकटातून आपण काय शिकलो आहोत ते पाहिले पाहिजे. कोकण भागात भूमिगत विद्युत तारांची व्यवस्था करू शकतो का याचा विचार करावा लागेल. त्याचप्रमाणे सिमेंटच्या पत्र्याला काही पर्याय आहे का किंवा कोकण किनारपट्टीवर कायमस्वरूपी सुरक्षितरित्या निवारे उभारता येतील का याचा विचार करणे गरजेचे आहे. आता जे नुकसान झाले आहे तसे भविष्यात घडू नये, यासाठी प्रयत्न करावे लागतील.

मदत कार्य करताना प्राधान्य ठरवा, लोकांना विश्वासात घ्या. कुठलाही गैरसमज पसरू देऊ नका. प्रशासनातले अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा माणसेच आहेत, त्यामुळे मनुष्यबळाचे योग्य नियोजन करा. पंचनामे तातडीने करून पाठवा, जिथे ठप्प झालेले असेल तिथे दळणवळण तातडीने सुरु करा, मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून तातडीने वीजपुरवठा सुरु करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करा. आता पावसाळा सुरू होईल, त्यामुळे अधिक मोठे आव्हान असेल. अंतर्गत रस्ते दुरुस्त करून घ्या. लहान लहान दुकानदार, व्यावसायिक, मूर्तिकार, मच्छीमार यांना तातडीने मदत करा, अशा सूचनाही श्री. ठाकरे यांनी दिल्या.

प्रशासनाचे कौतुक

कोरोनाच्या संकटाचे आव्हान असताना आपण ज्या धैर्याने या वादळाचा सामना केला त्याला तोड नाही. जिल्हा प्रशासन, पोलीस, एनडीआरएफ, स्वयंसेवी संस्था, कोळी बांधव, इतर संघटना या सर्वांनी धीराने मुकाबला केला. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गचे कमी नुकसान झाले असले तरी बऱ्याच ठिकाणी वीज यंत्रणेत बिघाड झाला आहे आणि तो दुरुस्त करून पुरवठा सुरळीत व्हावा. गावांचे संपर्क रस्ते दुरुस्त करणे गरजेचे आहे. जिल्ह्याला कमीतकमी २५ ते ३० कोटी रुपये देण्याची गरज आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री ॲड. परब यांनी तिथूनच या कॉन्फरन्समध्ये सहभागी होऊन नुकसानीची माहिती दिली. विशेषत: मंडणगड, दापोली, रत्नागिरीला जास्त फटका बसला आहे. बरीच घरे उद्ध्वस्त झाली आहेत, विजेचे खांब तुटले आहेत. शिधावाटप यंत्रणेतील भिजलेले धान्य बदलून नवे धान्य देण्यात येत आहे. घरांचे पत्रे उडाले आहेत. सध्या ते उपलब्ध नाहीत. आता पावसाळा येत असून लवकरात लवकर पत्रे उपलब्ध करणे गरजेचे आहे.

नगरविकास मंत्री श्री. शिंदे हे देखील रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यातून सहभागी झाले. ते म्हणाले, फयान वादळापेक्षा जास्त नुकसान झाले असल्याने प्रति कुटुंब रोख मदतीची नागरिकांची मागणी आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद आहेत, त्यामुळे जनरेटर संच द्यावे लागतील. ट्रान्सफॉर्मर्स, खांब पडले आहेत. वीज वितरणाचे इतर जिल्ह्यांतून कर्मचारी मागवावे लागतील. तसेच अडथळे दूर करण्यासाठी पडलेली झाडे तातडीने काढावी लागतील.

पालघरचे पालकमंत्री श्री. भुसे यांनी पालघर जिल्ह्यातील नुकसानीची माहिती दिली. या जिल्ह्यांतून खासदार, आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधी यांनी देखील आपल्या सूचना मांडल्या.

बागा नष्ट झाल्याने विवंचना

यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे प्राथमिक स्वरूपात झालेल्या नुकसानीची विस्तृत माहिती देण्यात आली. विजेचे खांब व झाडे पडणे, घरांवरील पत्रे, कौले उडून जाणे, भिंती कोसळणे, तसेच अंतर्गत रस्ते खराब होणे, दळणवळण यंत्रणा ठप्प होणे असे नुकसान झाले आहे. सुपारी बागायतदारांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी नारळी, पोफळी, आंब्याच्या बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच १५-१५ वर्षे काळजीपूर्वक वाढवलेली ही झाडे नष्ट झाल्याने आता भविष्यात काय करायचे हा प्रश्न उभा ठाकला असल्याचे काही लोकप्रतिनिधी म्हणाले.

नुकसान भरपाईची आगाऊ रक्कम देणार

चक्रीवादळाचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. विविध पथके तयार करून हे पंचनामे व्यवस्थित करण्यास सांगितले आहे. नुकसान भरपाईची काही आगाऊ रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊन पंचनामे होताच ती वितरित केली जाईल, त्यामुळे थोडासा दिलासा मिळेल. सध्याच्या घडीला केवळ दुरुस्ती नव्हे तर वीज यंत्रणेतील पायाभूत सुविधा उभारण्याचा अनुभव असलेल्या संस्था आणि कंपन्यांना तातडीने काम सुरु करण्याचे निर्देश महावितरणला दिले आहेत, असे मुख्य सचिव मेहता यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading