Sunday, June 21, 2026
NATIONAL

CBSE दहावीचा निकाल जाहीर,

मुंबई, दि. १५ – सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी जाहीर होणार यांची उत्सुकता होती. या निकालाकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे डोळे लागले होते. आज अखेर सीबीएसई बोर्डाचा निकाला जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचा यंदा दहावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल ९८ टक्के लागला असून देशभरात राज्याचा चौथ्या क्रमांक लागला आहे. देशभरातून ९३.३१ टक्के विद्यार्थिनी तर ९०.१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर तृतीयपंथीय विद्यार्थ्यांचा निकाल ७८.९५ टक्के इतका लागला आहे. यंदा सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकात मुलींनी बाजी मारली आहे.

सीबीएसईची दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्याने १९ ते ३१ मार्चपर्यंतची परीक्षा स्थगित करण्यात आली. पण कोरोनाची अनिश्चित परिस्थितीमुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेत मंडळाने मूल्यांकन पद्धतीने निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्या आधारे सीबीएसईमार्फत आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. सीबीएसईचा दहावीच्या परीक्षेला देशभरातून १८ लाख ८५ हजार ८८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १८ लाख ७३ हजार १५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी १७ लाख १३ हजार १२१ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. देशभरात दहावीचा निकाल यंदा ९१.४६ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल ०.३६ टक्क्यांनी वाढला आहे. गतवर्षी ९१.१० टक्के निकाल लागला होता. यंदा दहावीची परीक्षा ५ हजार ३७७ केंद्रावर झाली. दहावीच्या निकालात पुन्हा मुलींनी बाजी मारली आहे. मुलांंच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ३.१७ टक्क्यांनी अधिक आहे. विभागवार निकालामध्ये त्रिवेंद्रम ९९.२८ टक्के, चेन्नई ९८.९५ आणि बेंगळूरू ९८.२३ टक्के यांची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. तर पुणे विभागाने ९८.०५ टक्क्यांसह चौथा क्रमांक पटकावला आहे.

मूल्यांकन पद्धतीचा वापर करत यंदा सीबीएसईने दहावीचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सर्व विषयांची परीक्षा दिली. त्यांच्या परीक्षेतील कामगिरीवर निकाल जाहीर करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांनी तीनपेक्षा जास्त विषयांची परीक्षा दिली. अशा विद्यार्थ्यांचे तीन विषयातील सर्वाधिक गुणांच्या सरासरीचे गुण परीक्षा न झालेल्या विषयांना देण्यात आले. तर ज्या विद्यार्थ्यांनी फक्त तीन विषयांचीच परीक्षा दिली. अशा विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण मिळालेल्या दोन विषयांचे सरासरी गुण परीक्षा न दिलेल्या विषयांना देण्यात आले आहेत.

सीबीएसईचा जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या निकालात २ लाख २६ हजार १६२ विद्यार्थ्यांना यंदा ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. यामध्ये ९५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ४१ हजार ८०४ तर ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक टक्के मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ८४ हजार ३५८ इतकी आहे.

सीबीएसईने निकालातून अनुत्तीर्ण हा शब्द काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनुत्तीर्ण शब्दाऐवजी ‘आवश्यक पुनरावृत्ती’ हा शब्द वापरण्यात आला आहे. त्यामुळे संकेतस्थळावर किंवा विद्यार्थ्यांना मिळणार्‍या गुणपत्रिकेमध्ये अनुत्तीर्ण शब्दाचा उल्लेख असणार नाही.

विद्यार्थ्यांना डिजिटल गुणपत्रिका, उत्तीर्ण प्रमाणपत्र, स्थलांतरित प्रमाणपत्र, कौशल्य प्रमाणपत्र डिजीलॉकरमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना डिजीलॉकरची माहिती सीबीएसईकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मेसेजद्वारे पाठवण्यात आली आहे.

दरम्यान सीबीएसई बोर्डाने सुप्रीम कोर्टाला १५ जुलै किंवा त्यापूर्वी दहावीचा निकाल जाहीर केला जाईल असे सांगितले होते. त्यामुळे आज सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला http://www.cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागले. त्यानंतर बेवसाईटवर लॉग इन करून दहावीच्या निकाल पाहण्याच्या लिंकवर क्लिक करावे लागले. मग नव्या टॅबमध्ये ही लिंक ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला या नव्या पेजवर निकाला पाहण्यासाठी रोल नंबर, स्कूल नंबर, सेंटर नंबर आणि हॉल तिकिट आयडी टाकावा लागले. मग तुम्हाला तुमचा निकाला दिसेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading