युती संदर्भात उद्धव ठाकरेंकडून जाहीर करणं बाकी – प्रकाश आंबेडकर
मुंबईः भाजपसोबत कधीही निवडणुका लढणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आमचा खिमा केला आहे. माझी आणि माझ्या पक्षाची ताकद मला माहीत आहे. काँग्रेस आणि शरद पवारांना मी चांगला ओळखतो, सेनेसोबत समझोता करण्यासाठी मी तयार आहे, एकत्र लढण्याबाबत ठाकरेंकडून जाहीर करणं बाकी आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, माझ्या पक्षाची ताकद मला माहिती आहे. आमची सेनेसोबत जाण्याची भूमिका सेनेनं जाहीर करायची आहे. जाहीरपणे कधी सांगायचे हे सेनेने ठरवावे. चार भिंतीत एकत्र जायचे हे आमचे ठरले आहेत. सेना आमच्यासोबत येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय, काँग्रेस-एनसीपी आमच्या सोबत येणार नाही हे मला माहीत आहे. शिवसेनेनी आता आमची युती कधी होणार हे जाहीर करण्याबाबत ठरवले पाहिजे,
भाजप आणि आरएसएसबरोबर वंचित बहुजन आघाडी कधीही जाणार नाही. त्यांच्यासोबत व्यवस्थेचं भांडण आहे. भाजपसोबत कोणत्याही प्रकारचा समझोता करणार नाही. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार हे स्पष्ट आहे. तसेच एकनाथ शिंदेंनी भाजपची साथ सोडल्यास आम्ही त्यांच्यासोबत युतीचा विचार करू, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत. एकनाथ शिंदे हे खानदानी आहेत. एकनाथ शिंदे जुने शिवसैनिक आहेत. ते 70च्या काळातील शिवसैनिक आहेत. पँथर आणि शिवसेना यांचं नातं त्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. पँथर आणि आनंद दिघेंचे संबंध नव्या पिढीला माहीत नाही. पँथर आणि आनंद दिघेंचे संबंध खूप चांगले होते, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
तसेच पत्रकारांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी तुम्ही काल मध्यरात्री एकनाथ शिंदेंना भेटलात का?, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मी गेली 15 दिवस उद्धव ठाकरेंना भेटलो नाही. महिन्याभरात मी महाराष्ट्रातच नाही. त्यामुळे भेटण्याचा प्रश्नच नसल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे. तसेच कालची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमवेतची भेट ही इंदू मिलबाबत असल्याचंही त्यांनी सांगितले.