Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRA

मध्ययुगीन काळात लाखो लोकांची तहान भागविणाऱ्या बारवांना प्रशासन देणार कृतज्ञतेचा हात…!!

लातूर  : मध्ययुगीन काळात शुद्ध पिण्याचे पाणी वर्षभर जनतेला मिळावे म्हणून अत्यंत कमी बाष्पीभवन होणाऱ्या बारवा विहिरींची निर्मिती झाली. मागच्या चार पाच दशकात गावागावात आणि शहरात पाणी पुरवठा योजना आल्या… आणि ‘गरज सरो वैद्य मरो’ या म्हणी प्रमाणे शेकडो वर्षे तहान भागविणाऱ्या बारवा कचरा कुंडी झाल्या. जिल्हा प्रशासनाने या बारवाचे संवर्धन करायचे ठरवले असून आज बारवाचे शहर रेणापूर, ज्या शहरात 16 बारवा विहिरी आहेत. त्या शहरापासून या मोहिमेला जिल्हा नगरपरिषद प्रशासन विभागाचे सह आयुक्त रामदास कोकरे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यावेळी तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, रेणापूर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी मंगेश शिंदे, लातूर देवराईचे प्रवर्तक सुपर्ण जगताप, पर्यावरणासाठी काम करणारे पत्रकार दीपरत्न निलंगेकर, अभय मिरजकर, डॉ. बी. आर. पाटील,यांच्या सह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, प्रसार माध्यमातील वरिष्ठ पत्रकार यावेळी उपस्थित होते.

टोळ्यातून समूहात आणि समूहातून ग्राम व्यवस्थेत मानवी जीवन स्थिर झालं ते पाण्याच्या काठी… माणसांची, जनावरांची तहान भागवणारी व्यवस्था माणूस प्रगत होत गेला तसतशी बदलत गेली… डेक्कन बेल्ट हा पक्क्या अग्निजन्य खडकातला.. भूगर्भ स्त्रीस्तरीय रचनाचा.. आणि प्रखर उष्णतेचा त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन टाळण्यासाठी 11 व्या शतकापासून राष्ट्रकुट, चालुक्य, यादव यांच्या काळा पर्यंत मोठ्या प्रमाणात बारवा विहिर बांधण्याची व्यवस्था निर्माण झाली. अशा बारवा लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत. काही गावातील आणि शहरातील बारवा शेकडो वर्षाचा इतिहास सोबत घेऊन अजूनही नांदत आहेत.. यांचे वैभव परत येणार नाही पण त्यांनी लाखो लोकांची तहान भागवली, त्या मानवतेच्या दृष्टीने कृतज्ञता म्हणून तसेच आपल्या संस्कृतीच्या वैभवी खुणा म्हणून त्या जपल्या पाहिजेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सह आयुक्त रामदास कोकरे यांच्या सहकार्याने हे काम लातूर जिल्ह्यात होणार आहे.

भारतीय समाज जल, जमीन आणि जंगल राखण्यासाठी पुढे येतो आहे…या कामी हजारो हात पुढे येऊन जोडले जातील.. आणि जल संवर्धनाबरोबर आपल्या संस्कृतीचे जतन होणारी ही चळवळ लातूरचा आणखी एक नवा पॅटर्न तयार करील, अशी अपेक्षा यावेळी सर्वांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading