स्वरविलासमध्ये रसिकांनी लुटला गायनाचा आनंद
पुणे : बांधकाम व्यावसायिक विलास जावडेकर यांच्या पुढाकाराने आयोजित ‘स्वरविलास’ या कार्यक्रमात मेवाती घराण्याचे गायक पंडित संजीव अभ्यंकर आणि जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका धनश्री घैसास यांच्या गायनाचा रसिकांनी आनंद घेतला. कोथरूड येथील बाल शिक्षण मंदिर शाळेच्या एमईएस सभागृहात रविवारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक विलास जावडेकर व कल्पना जावडेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राची सुरुवात धनश्री घैसास यांच्या गायनाने झाली. राग मुलतानीने त्यांनी सादरीकरणाला सुरुवात केली. विलंबित तीन तालात ‘अरे मन काहे को सोचन करे’ आणि ‘नैनन मैं आनबान’ या बंदिशी त्यांनी सादर केल्या. त्यानंतर ‘भीगी जाऊ मैं पिया’ ही कजरी सादर करीत पहिल्या सत्राचा समारोप केला.
दुसऱ्या सत्रात पं. संजीव अभ्यंकर यांचे गायन झाले. राग नटनारायणने त्यांनी सुरुवात केली. यात ‘मन मैं बसी जबसे’ आणि ‘निरंकार नारायण’ सादर केले. त्यानंतर राग जोगकंसमध्ये ‘इतनी बिनती सुनो मोरे पिया’ सादर केले. यानंतर हिंदी बदानी सादर केली. राग भैरवीने त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली. त्यांना स्वरसाथ विलीना पात्रा आणि साईप्रसाद पांचाळ यांनी दिली तर तानपुरा साथ मुक्ता जोशी यांनी दिली. दोन्ही कलाकारांना तन्मय देवचके (संवादिनी) व अजिंक्य जोशी (तबला) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा मोडक यांनी केले.