लाखीमपूर घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं मौन सोडावे – सुप्रिया सुळे
पुणे : तीन दिवसा पूर्वी उत्तर प्रदेशातील लाखीमपूर येथे आंदोलक शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने चिरडले होते. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं मौन सोडून बोलले पाहिजे असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी व्यक्त केलं.
खासदार सुळे यांनी आज महात्मा फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली त्या भिडे वाड्याला भेट भेट दिली यावेळी पत्रकारांशी संवाद साधतान त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ आदी यावेळी उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या ,की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिला असून केंद्रातील मोदी सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे.
‘महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. ही वास्तू सामाजिक, ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे; पण त्याचे पुणे महानगरपालिकेकडुन अद्यापही योग्य प्रकारे जतन होत नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे या संबंधी बैठक घेऊन तातडीने हा विषय मार्गी लावणार असल्याचे सुळे यांनी यावेळी सांगितले.
