माडगूळकर कुटुंबीयांनी साहित्य परिषदेत केले गदिमांना अभिवादन
पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते गदिमांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, त्यांच्या ग्रंथाचे पूजन करून, गदिमांची पणती पलोमा हिने गदिमांच्या कविता सादर करून, पणतू मृगांकने गीत सादर करून, नात लीनता आंबेकर, नातसून प्राजक्ता माडगूळकर, उल्हास आणि विनया बापट यांनी काव्यवाचन करून आणि कुटुंबातील सदस्यांनी आठवणी जागवत महाराष्ट्र वाल्मिकी ग दि माडगूळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेत गदिमांना अभिवादन केले. गदिमांचे चिरंजीव आनंद माडगूळकर, सून स्मिता माडगूळकर, नातू सुमित्र माडगूळकर, नातसून प्राजक्ता माडगूळकर, पणती पलोमा माडगूळकर, नात लीनता आंबेकर ,नात जावई अलोक आंबेकर ,पणतू मृगांक आंबेकर, प्रा उल्हास बापट, संत साहित्याचे अभ्यासक डॉ रामचंद्र देखणे, साहित्यिक न. म. जोशी, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त राम कोल्हटकर, भैयासाहेब देशपांडे, राजेश कुलकर्णी, संवादचे सुनील महाजन, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, प्रमोद आडकर, दीपक करंदीकर, उद्धव कानडे, बंडा जोशी, राजन लाखे यावेळी उपस्थित होते.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘गदिमांचे भव्य स्मारक पुण्यात होईल. त्यासाठी साहित्यिकांच्या सूचना महत्त्वाच्या आहेत.
मनोगत व्यक्त करताना प्रा. जोशी म्हणाले, ‘गदिमा हे प्रतिभेचे उत्तुंग शिखर आहे त्यांचे नाव घेताच मराठी माणसांच्या मनात आनंदाचे आणि अभिमानाचे कारंजे सुरू होते. अंगणात प्राजक्ताचा सडा पडावा तसा गदिमांच्या प्रतिभासृष्टीत शब्द सुमनांचा सडा पडत असे ही शब्दफुले वेचून त्याच्या काव्यमाला तयार करून गदिमा त्या सरस्वतीच्या चरणी अर्पण करीत. फुले सुकतात देवाला वाहिली तरी दुसऱ्या दिवशी त्यांचे निर्माल्य होते पण गदिमांच्या काव्यफुलांना अम्लानतेचे वरदान लाभले आहे .त्यांचे साहित्य हा मराठीचा चिरंतन ठेवा आहे. गदिमांच्या निधनाला त्रेचाळीस वर्षे झाली. गदिमांच्या जन्मशताब्दीची सांगता झाली तरी त्यांचे यथोचित स्मारक त्यांची कर्मभूमी असलेल्या पुण्यात होऊ शकले नाही. इतकी सरकारे आणि गेली पण कोणीही काहीही ठोस केले नाही. गदिमांच्या स्मारकाबाबत आजवर राज्यकर्त्यांनी जी असंवेदनशीलता दाखवली ती वेदनादायक आहे . पुण्याचे महापौर दिलेला शब्द पाळतील अशी आशा आहे. कोट्यवधी मराठी जनतेने आपल्या हृदय सिंहासनावर गदिमांना जे अढळ स्थान दिले आहे तेच त्यांचे चिरंतन स्मारक आहे.’
