fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRAPUNE

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये बंधुतेचा विचार रुजवावा – प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया

पुणे : “समाज घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेतील स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या मूल्यांतील बंधुतेचा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजायला हवा. त्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा,” असे मत ज्येष्ठ साहित्यिक, माजी बंधुता साहित्य संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी व्यक्त केले.


राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व महाराष्ट्र विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन रविवारी झाले. चिखली येथील कॉनक्वेस्ट महाविद्यालयात हे संमेलन होत आहे. यावेळी परिषदेचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, संमेलनाध्यक्ष प्राचार्य प्रा. प्रदीप कदम,  स्वागताध्यक्ष अनिल पाटील, कवी चंद्रकांत वानखेडे, माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, माजी स्वागताध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, प्रकाश जवळकर, संयोजक महेंद्र भारती, प्रा. वैभव पताळे, प्रा. प्रशांत रोकडे, शंकर आथरे आदी उपस्थित होते. प्रसंगी ‘बंधुतेचे विस्तीर्ण क्षितिज’ पुस्तकाचे प्रकाशन व गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

प्रा. डॉ. पगारिया म्हणाले, “बंधुतेचा विचार माणूस जोडणारा आहे. माणूस जोडत गेलो, तर समाज, देश एकसंध राहील. मानवतेचा बंध अधिक दृढ होत जाईल. समाजात बंधुतेचा विचार पेरण्यासाठी अशी साहित्य संमेलने उपयुक्त ठरतात. कोरोनासारखी संकटे आली, तरी आपली मूल्यांवरील श्रद्धा कायम ठेवली पाहिजे.”
प्रकाश रोकडे म्हणाले, “कोरोनाच्या साथीनंतर सगळी क्षेत्रे सुरू झाली. मात्र, अद्यापही ज्ञानमंदिरे बंद आहेत. शिक्षणसंस्था, शिक्षक आणि पालकांनी मनातील अनावश्यक भीती काढून टाकावी आणि संहिता पाळून शाळा सुरू करण्यात पुढाकार घ्यावा. शाळा बंद ठेवणे राष्ट्रहिताचे नाही. प्रतिकूल परिस्थितीतही अनेक शिक्षक चांगले काम करताहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे नवी आव्हाने आहेत. शिक्षकांनी अद्ययावत ज्ञान आत्मसात करत विद्यार्थ्यांना नव्या युगाचे शिक्षण देण्यावर आपण भर दिला पाहिजे.”
डॉ. अरुण आंधळे, डॉ. विजय ताम्हाणे, प्रकाश जवळकर यांनीही आपली मनोगते व्यक्त केले. स्वागताध्यक्ष अनिल पाटील यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत रोकडे व महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. आभार प्रा. अमोल कवडे यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading