ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचा पराभव
सिडनी – तमाम क्रिकेटप्रमींच्या एक दिवसीय सामान्याला सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यांत भारताचा ऑस्ट्रेलियाकडून 66 धावांनी पराभव झाला आहे. त्यामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाने भारताला 375 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र निर्धारित 50 षटकांमध्ये भारताला 8 विकेट्स गमावून 308 धावा करता आल्या. 375 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय चांगली झाली. सुरुवातीच्या पाच ओव्हरमध्ये भारताने 50 रन्स केल्या. परंतु नंतर लागोपाठ अंतराने विकेट्स पडत असताना शिखर धवन आणि हार्दिक पांड्याने भारताचा डाव सावरला. शिखर धवनने 86 बॉलमध्ये 74 रन्स केल्या. तर हार्दिक पांड्याने बहारदार खेळी करताना 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 76 बॉलमध्ये 90 धावा फटकावल्या.
शिखर-हार्दिक खेळपट्टीवर असताना भारताच्या विजयाच्या आशा होत्या. मात्र शिखर आऊट झाल्यानंतर चुकीचा फटका मारुन पांड्याही बेलबाद झाला. शतकाच्या उंबरठ्यावर असताना त्याने आपली विकेट्स चुकीचा फटका मारुन ऑस्ट्रेलियाला बहाल केली.
भारतीय कर्णधार विराट कोहली, मयांक अग्रवाल, के एल राहुल, श्रेयश अय्यर मोठी खेळी उभारण्यात अपयशी ठरले. मयांक 22, कोहली 21, श्रेयस 2, तर राहुल 12 धावा काढून तंबूत परतले. 375 धावांच्या डोंगराचा पाठलाग करत असताना साहजिक खेळाडूंवर दडपण आलं होतं. हेच दडपण पांड्या आणि शिखर धवन वगळता दुसऱ्या खेळाडूंना झुकारुन देण्यात अपयश आलं.
