चांगल्या पत्रकारितेला वाचकांचाही प्रतिसाद ही हवाच!
यावेळी बोलताना सरदेसाई म्हणाले, “तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी बदलल्या. आता सगळ्या गोष्टी लाइव्ह होत आहेत, मात्र बातमीची सत्यता पडताळण्यासाठी कोणातीच यंत्रणा नाही. समाज माध्यमांवर पत्रकार नसलेले सॉफ्टवेअर इंजिनीअर हे अल्गोरिदमच्या माध्यमातून बातम्यांचा क्रम ठरवत आहे. लोकांना बातमीत सेन्स नको तर सेन्सेशन हवे आहे.”
प्रसन्न जोशी म्हणाले, “आजूबाजूची परिस्थिती तटस्थ नसल्याने तटस्थ बातमीवर त्याचा परिणाम होत आहे. तुम्ही कोणतीही बातमी द्या, तुमच्यावर सतत दोन्ही बाजूंनी टीका होत असते. त्यामुळे माध्यमे, बातमीदारी बदलायला हवी म्हणत असताना आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, लोकांमुळे माध्यमे बदलली आहेत. याची लोकांवर काहीच जबाबदारी नाही आणि ते चांगल्या कार्यक्रमांना प्रतिसाद देत नाहीत, ही आजची परिस्थिती आहे.”
आशिष दीक्षित म्हणाले, “ सोशल मीडियावर प्रकाशित होणाऱ्या बातम्यांमध्ये भावनांना जास्त महत्त्व दिले जाते. न्युजरुममध्ये ट्रेंड पाहिले जातात आणि भावनेनुसार अजेंडा सेटिंग केले जाते. मात्र पत्रकारितेच्या या खालावत असलेल्या दर्जाबाबत पत्रकारांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे. चांगल्या पत्रकारितेची आर्थिक गणिते जुळविण्यासाठी वेगळे रेव्हेन्यू मॉडेल विकसित करण्याची गरज आहे.”