“पाणी प्रश्नावर सवंग राजकारण नको, पाणी द्या, नाहीतर टँकरचे पैसे द्या” : आपची मागणी
पुणे : वाढत्या उष्म्या सोबतच पुण्यात पाणी प्रश्न ही पेटू लागला आहे. पाणी पुरवठा केंद्रात मुबलक पाणी साठा असून ही नागरिकांना मात्र पाणी विकत घ्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने ‘टँकर मुक्त पुणे’ करण्याचा ध्यास घेतला आहे. तसेच “पाणी प्रश्नावर सवंग राजकारण नको, पाणी द्या, नाहीतर टँकरचे पैसे द्या” अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
“टँकर माफिया मुक्त दिल्ली” या यशस्वी प्रयोगाने. दिल्लीतील नागरिकांना हक्काचे वीस हजार लिटर पाणी मिळते; पुण्यात मात्र पाणी कर भरून ही नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. 800 ते 1200 रुपये प्रति टॅन्कर दराने पैसे मोजावे लागत आहेत. तर अनेक रहिवासी सोसायट्या या टँकर माफियांच्या विळख्यात सापडल्या आहेत. राजकीय वरदहस्तामुळेच हे होत आहे. पुणे शहरात पाण्याचा मुबलक साठा असून ही नळाला मात्र पाणी येत नाही अशी परिस्थिती आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या भागांत पाणी पुरवठ्याचा प्रश्न गांभीर आहे. त्या भागात अजून ही पाणी पोहोचलेले नाही.
त्यामुळे ‘टँकर मुक्त पुणे’ हा नारा घेवून आम आदमी पक्ष रिंगणात उतरला आहे. आम आदमी पक्षाने पाणी प्रश्न ऐरणीवर घेतला आहे. ज्या भागांमध्ये नळ जोडणीद्वारा पाणी पुरवठा पोहोचला नाही त्या ठिकाणी महानगरपालिकेणे स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा करणे क्रमप्राप्त आहे. त्याचा भुर्दंड नागरिकांवर बसवू नये अशी मागणी ‘आप’ ने केली आहे.
ज्या रहिवासी सोसायट्यांमध्ये पाणी पुरवठा केला जात नाही त्यांच्या कडून पाणीपट्टी घेण्याचा अधिकार महानगरपालिकेला नाही. पाणी साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही जाणीवपूर्वक कृत्रिम तुटवडा निर्माण करून टँकर लॉबीचे उखळ पांढरे करून दिले जात आहे व त्यासाठी सामान्य पुणेकरांना वेठीस धरून त्यांना मूलभूत हक्क पासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोप आम आदमी पक्ष करीत आहे.
त्यामुळे त्या विरोधात आम आदमी पक्षाचे राज्य संघटक विजयजी कुंभार यांच्या नेतृत्वाखाली येत्या काळात तीव्र स्वरूपाचे जल हक्क आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा संकेत आपचे प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे, जल हक्क समितीचे सुदर्शन जगदाळे, आबासाहेब कांबळे यांनी दिला आहे.