आपत्ती व्यवस्थापनाचे धडे प्रत्येकाने घेणे आवश्यक -डॉ. नितीन करमळकर
पुणे: ज्यावेळी माळीण किंवा भिलारसारख्या घटना होतात तेव्हा आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेणे का गरजेचे आहे हे जाणवते. हे धडे प्रत्येकाने घेणे ही काळाची गरज आहे असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि महाराष्ट्र शासन,गृह विभाग नागरी संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ ते ११ मार्च, २०२२ या कालावधीत पुणे शहरातील महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी नागरी संरक्षण प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करण्यात आले होते. दिनांक ११ मार्च, २०२२ रोजी या कार्यशाळेचा समारोप झाला. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.नितीन करमळकर, नागरी संरक्षण संचालनालयाचे वरीष्ठ प्रशासिकीय अधिकारी संजय जाधव, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ.संजय चाकणे, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक अनिल आवारे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे व प्रशिक्षणार्थी प्राध्यापक उपस्थित होते.
पाच दिवसीय संपन्न झालेल्या या कार्यशाळेत ४० महाविद्यालयातील ६० प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. यावेळी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी संजय जाधव म्हणाले की, विद्यापीठाने आपत्ती व्यवस्थापन हा विषय घेऊन महाराष्ट्र शासनाबरोबर आयोजित केलेली ही कार्यशाळा म्हणजे एक अभिनव उपक्रम आहे. यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी आपत्ती व्यवस्थापन या विषयाला घेऊन सजग होतील. याचा निश्चित फायदा देशाच्या सुरक्षिततेसाठी होईल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक अनिल आवारे यांनी केले.