‘ही’ मागणी पूर्ण झाल्या शिवाय शेतकरी आंदोलनाची सांगता नाही – राकेश टिकैत
नवी दिल्ली : सोमवारी संसदेत तीन कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक मंजूर झाल्यानंतरही शेतकरी दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून आहेत. त्यामुळे शेतकरी आंदोलन कधी मागे घेणार या बाबत चर्चा सुरू झाली आहे. यावर भाष्य करताना शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी डिसेंबर महिन्यात आंदोलन मागे घेण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले. पण किमान हमी भावाचा कायदा झाल्या शिवाय शेतकरी आंदोलनाची सांगता नाही, असेही राकेश टिकैत यांनी सांगितले.
‘एबीपी न्यूज’ सोबत बोलताना राकेश टिकैत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल असे वचन दिले आहे. मात्र, 1 जानेवारीपर्यंत किमान हमी भावाचा कायदा झाला नाही तर हा मुद्दादेखील शेतकरी आंदोलनाचा मुख्य मुद्या होईल. मात्र, सरकार असे होऊ देणार नाही, असे वाटते. त्यामुळे पुढील महिन्याच्या अखेरीस आंदोलनाची सांगता होऊ शकते.
पुढे बोलताना टिकैत म्हणाले की, सध्या सरकारच्या बाजूने वातावरण निर्मिती सुरू आहे. काही दिवसानंतर सरकारला जाग येईल आणि 10-11 तारखेनंतर चर्चा सुरू होईल. सरकार किमान हमी भावावर कायदाही तयार करेल, शेतकऱ्यांवरील खटले मागे घेतले जातील. त्यानंतरच आंदोलनाची सांगता होईल.