शक्ती मिल गॅंगरेप प्रकरण : ३ आरोपींची फाशीची शिक्षा रद्द
मुंबई : देशाला हादरवून सोडणाऱ्या २०१३ च्या शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावला. एकुण पाच आरोपींपैकी तीन आरोपींना फाशीची कठोर शिक्षा व्हावी, अशी याचिका राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याचिकेवर निकाल देताना हायकोर्टाने फाशीची शिक्षा रद्द करत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेदरम्यान कोणताही पॅरोल नसेल, असेही कोर्टाने स्पष्ट केले. मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणात तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. एका इंग्रजी पाक्षिकात इंटर्नशीप करणाऱ्या २२ वर्षीय महिला फोटोग्राफरवर पाच जणांनी मिळून बलात्कार केल्याची घटना ही शक्तीमिल परिसरात घडली होती.
याआधी तिन्ही आरोपींनी २०१९ मध्ये सत्र न्यायालयाच्या फाशीच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. पण ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. शक्ती मिल बलात्कार प्रकरणात एकुण पाचपैकी तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामध्ये एकाला जन्मठेपेची शिक्षा याधीच सुनावण्यात आली होती. तर एका अल्पवयीन मुलावर स्वतंत्र गुन्हा दाखल होऊन ज्युवेनाईल कायद्याअंतर्गत हे प्रकरण चालले होते. सत्र न्यायालयाच्या निकालाचा निकालावर उच्च न्यायालयात निकाल देताना न्यायमूर्ती साधना जाधव, पृथ्वीराज चव्हाण यांनी तीनही आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आज सुनावली. त्यामुळेच मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आश्चर्यकारक असल्याची प्रतिक्रिया समोर येत आहे. शक्ती मिल बलात्कार प्रकरणानंतर पिडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी फाशीची मागणी जोर धरत होती. हायकोर्टाने कायद्याच्या दृष्टीने निर्णय ठरवला.