क्रूझ प्रकरणातून मीच हटलो वानखेडे यांचा दावा, तर मलिक म्हणतात ही तर फक्त सुरुवात आहे
मुंबई : क्रूझ ड्रग्ज (Cruise Drugs Case) प्रकरणामध्ये झालेल्या विविध आरोपांनंतर एनसीबीने (NCB) समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याकडून आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणाचा तपास काढून घेतला. यावर समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आर्यन खान आणि इतर पाच प्रकरणांचा तपास आपल्याकडून काढून घेण्यात आला नाही, तो आता केंद्रीय संस्थेच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे तसेच मीच या प्रकरणातून हटवण्याची मागणी केली होती, असा दावा केला, तर दुसरीकडे नवाब मलिक यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली. ही तर फक्त सुरुवात आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
समीर वानखेडे यांच्या बदली झाल्याची देखील चर्चा सुरू होती. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समीर वानखेडे यांनी स्वत: आपली बदली झाली नसल्याचे सांगितले आहे. ‘माझी बदली झालेली नाहीये, मी अद्याप झोनल डायरेक्टर पदावर कायम आहे. बदलीच्या फक्त अफवा आहेत, माझ्याकडील फक्त केसेस दिल्लीतील टिमकडे देण्यात आल्या आहेत. मी माझ्या याचिकेत म्हटलं होतं की या दोन केसेसचा कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणेकडून तपास करावा. आर्यन खान, समीर खान यांच्या केसचा आयपीएस संजय सिंह यांच्या नेतृत्वात तपास होणार. तसंच त्यांनी ‘मी मुंबईतच झोनल डायरेक्टर म्हणून कायम आहे, असंही स्पष्ट केलं.
दरम्यान, नवाब मलिक यांनी ट्विट करता प्रतिक्रिया दिली आहे. समीर वानखेडे यांना पाच प्रकरणांच्या तपासावरून हटवण्यात आलं आहे. एकूण २६ प्रकरणे असून त्याची चौकशी होणं आवश्यक असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसच ही सुरुवात असून सगळी यंत्रणा स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे आणि ती आम्ही करणार, असं नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.