हवामान खात्याचा उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर या आठ जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुणे:श्रीलंका आणि तामिळनाडू किनारपट्टी परिसरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यापासून राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे, गेल्या तीन दिवसांत कोल्हापूरसह दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. यानंतर आता अरबी समुद्रात देखील हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या एकूण आठ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
खरंतर, देशात सध्या ईशान्य मोसमी वारे सक्रिय आहेत. त्यामुळे दक्षिण भारतातील बहुतांशी राज्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागातही पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याने उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर या आठ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.