ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याना तातडीने वेतन अदा करावे – विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ
पुणे:पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावाच्या ग्रामपंचायतीच्या कर्मचारी वर्गाचे गेल्या चार महिन्यांपासून वेतन दिले गेलेले नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांना तातडीने वेतन अदा करावे, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी महापालिका – आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
धुमाळ यांनी सांगितले की, ३० जूनला महापालिका हद्दीत २३ गावे आली तेव्हापासून येथील ग्रामपंचायतीकडील कर्मचारी हे महापालिकेच्या सेवेत आले आहेत. मात्र आज चार महिने उलटले तरी त्यांना वेतन अदा केले गेलेले नाही. परिणामी त्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे .
समोर कोरोनामुळे निर्माण झालेले संकट व आता दिवाळी सण सुरू होत असताना बोनस तर सोडा पण वेतनच नसल्याने हे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. सण कसा साजरा करायचा, दैनंदिन खर्च कसा भागवायचा, मुलांची शैक्षणिक फी कशी भरायची, घराचे हफ्ते कसे भरायचे असे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत. या कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखिची झाली आहे. या कर्मचाऱ्यांना या संकटातून बाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सत्ताधारी भाजप व पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हा प्रकार घडला आहे असा आरोप विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे.
पुढे बोलताना धुमाळ म्हणाल्या नवीन वेतनाची रुपरेषा ठरेपर्यंत त्यांना तत्कालीम ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असताना जे वेतन मिळते होते, तेच वेतन सध्या गृहित धरून चार महिन्यांची थकबाकी अदा करण्यात यावी, अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे आहे.