राज्यात पुढील पाच दिवस पावसाच्या जोरदार सरींची शक्यता
पुणे:राज्यात पुढील पाच दिवस पावसाच्या जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या राज्यात पावसाने उघडीप दिली असून, काही भागात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. येत्या शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.
वायव्य मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. परिणामी महाराष्ट्रासह पूर्व-मध्य भारतात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. येत्या २२ सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
राज्यात पावसाने काढता पाय घेतला असून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. मात्र, पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात साधारणपणे गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत, तर येत्या बुधवारपर्यंत (ता. २२) राज्यात आकाश सामान्यतः ढगाळ राहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर २१ ते २२ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.