ग्रामीण महाराष्ट्राच्या विनोदाची नस दादा कोंडके यांना उमगली होती – डाॅ.श्रीपाल सबनीस
पुणेः विनोदाचे अनेक अंग असतात त्यातील द्विअर्थी विनोद प्रकार निवडून दादा कोंडके यांनी संपूर्ण महाराष्ट्राला भरभरून हसायला शिकवले.दादांना महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेची विनोदबुद्दीची नस गवसलेली असल्याने महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेने दादांना डोक्यावर घेतले होते, असे मत अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
दादा कोंडके फाऊंडेशनतर्फे देण्यात येणा-या समाजभुषण पुरस्काराचे वितरण सबनीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.यंदा 2020 आणि 2021 साठी अनुक्रमे दादा कोंडके यांच्या जीवनावर आधारीत एकटा जीव या आत्मचरित्राच्या लेखिका अनिता पाध्ये आणि रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड.प्रमोद आडकर यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी महावितरण पुणे कार्यालयाचे अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर दादा कोंडके फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त आणि कार्यक्रमाचे निमंत्रक मनोहर कोलते, फाउंडेशनचे सचिव राजेंद्र भवाळकर, जिल्हा सरकारी वकिल एन.डी.पाटील, खजिनदार विक्रम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख जिल्हा सरकारी वकिलपदी नियुक्ती झाली म्हणुन अॅड.एन.डी. पाटील, दुग्ध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले उद्योगपती नितीन थोपटे, आदिवासी लघुपटांचे निर्माते डाॅ. कुंडलिक केदारी, समाज प्रबोधनाच्या कार्याच्या कीर्तन रुपी सेवेबद्दल पूनम जाचक आणि स्केटिंग या खेळात देश पातळीवर सुवर्णपदक मिळविल्या बद्दल वैदही आणि श्रुतीका सरोदे या मान्यवरांचा 2020 या वर्षासाठी तर 2021 या वर्षासाठी विद्युत वितरण नियंत्रण समिती पुणे जिल्हा सदस्य पदी नियुक्ति झाल्याबद्दल रवींद्र गायकवाड आणि ह्युमन राईटस् पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती बद्दल अमरसिंह राजपूत (परदेशी) या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सबनीस पुढे म्हणाले, द्विअर्थी विनोद ही दादांची ओळख होती. पंरतू समाजातील काही घटकांनी त्याला नकारात्मक रंग दिला, त्याचा मी निषेध करतो. वास्तविक चावटपणा हा मनुष्याचा स्थायीभाव असून तो प्रत्येकात कमी-अधिक प्रमाणात स्थित असतोच. ह्याच स्थाय़ीभावाचा पुरेपुर उपयोग करुन दादांनी संपूर्ण महाराष्ट्राला भरभरून हसवले. त्यांच्या या द्विअर्थी विनोदामुळे त्यांना अनेकदा सेन्साॅर बोर्डाशी देखील झगडा द्यावा लागला, पंरतू त्यांनी ग्रामीण महाष्ट्रातील त्यांच्या प्रेक्षकांची प्रतारणा केली नाही.महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेशी जोडलेली नाळ कायम अखंडित ठेवत दादांनी त्यांच्या अभिरुचीला पटेल असेच चित्रपट दिले.