नारायण राणेंच्या अटकेसाठी मंत्र्यांचा दबाव, अधिकाऱ्यांची CBI चौकशी करा – आशिष शेलार
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरून राज्यभरातील राजकीय वातावरण तापले होते. दरम्यान राणे यांना काल अटक व जामिनही देण्यात आला. मात्र हा वाद आणखी सुद्धा निवळलेला दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजपनेते आशिष शेलार यांनी केली.
राणे यांच्या अटकेसाठी मंत्री अनिल परब यांनी दबाव टाकला. त्यांनी मंगळवारी गृहखात्याच्या कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तसंच कोर्टाच्या निर्णायाआधी त्यांनी जामीनाचा निवाडा घोषित केला. यातून मुंबई उच्च न्यायालयाची बदानामी आणि अपमान झाला आहे. हे संपूर्ण प्रकरण संशयित असल्याचा आरोप शेलार यांनी केला.
या प्रकरणात दबाव टाकणाऱ्या मंत्र्यासह IPS अधिकाऱ्यांची CBI चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. हे सगळे मुद्दे मांडताना त्यांनी एक व्हिडीओ क्लिप दाखवून अनिल परब यांच्यासह सरकारवर हल्लाबोल केला.
अटकपूर्व जामीन अर्ज 4 च्या दरम्यान निकाली निघाला. मात्र त्याआधीच मंत्री अनिल परब सांगतायत अर्ज नाकारण्यात येणार आहे, याचा अर्थ दलालांमार्फत किंवा या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचा मंत्रिमहोदयांनी प्रयत्न केलाही शंका दाट आहे. संभाषनात मुंबई उच्च न्यायालयाचा उल्लेख आहे. याचा अर्थ मुंबई उच्च न्यायालयाची बदानामी आणि अपमान करण्याचा हा प्रयत्न असल्याचं शेलार यांनी नमूद केलं.
वास्तविक पाहता, आयपीएस अधिकारी केंद्र सरकारला उत्तर देण्यास कटिबद्ध असतात. नारायण राणे केंद्रीयमंत्री आहेत. मात्र राज्याचा एक मंत्री आयपीएस अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्र्यांच्या अटकेसाठी फोन करत होते. न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येईल असं सांगत होते. एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद आहे. याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शेलार यांनी केली.