Good news – पुण्याच्या चारही धरणातील पाणीसाठयात वाढ
पुणे: गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यभरात दमदार हजेरी लावली आहे. खडकवासला धरण परिसरात तर यावर्षी हंगामातील सर्वाधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांमधील पाणीसाठ्यात दोन टीएमसीने वाढ झाली आहे. धरण साखळीतील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणात मिळून सध्या 11.3 टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्याच दिवशी धरणात 9.47 टीएमसी पाणीसाठा होता.
पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासात याठिकाणी 60 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 1 जूनपासून या परिसरात तब्बल 798 मिमी पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी याच काळात पवना धरणक्षेत्रात 484 मिमी पाऊस झाला होता. सध्या पवना धरण 40.44% टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात 2.59 टक्के तर 1 जूनपासून पाणीसाठ्यात 8.85 टक्के इतकी वाढ झाली आहे.
मुंबईतील तलावंही भरली
मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने येथील अनेक नद्यांना पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. तसेच गेल्या 24 तासांमध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा 1 लाख 28 हजार दशलक्ष लिटरने वाढला आहे. त्यामुळे डोक्यावर पाणीकपातीची टांगती तलवार असलेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर) मोडकसागर – 66,092, तानसा- 78,467, मध्य वैतरणा- 37,551, भातसा- 1,97,321, तुळशी- 8,046, विहार- 27,698.